Monday, May 12, 2025
Homeताजी बातमीवाचन केल्याशिवाय लेखक घडत नाही गिरीश प्रभुणे मसाप चा मराठी भाषा पंधरवडा...

वाचन केल्याशिवाय लेखक घडत नाही गिरीश प्रभुणे मसाप चा मराठी भाषा पंधरवडा समारोप

२९ जानेवारी २०२१,
लेखक किंवा कवीं होण्यासाठी दुसर्‍यांची पुस्तके वाचावी लागतात, वाचून मशागत व्हावी लागते. मी पु. शि. रेगे वाचले, मी पु.भा. भावे वाचले आणि माझ्यातला साहित्यिक घडला. साहित्य वाचनासाठी मी समाज हिंडलो आणि मला समाज कळला. आणि माझ्यातला कार्यकर्ता घडला. कामात सातत्य असल्याशिवाय कार्यकर्ता घडत नाही आणि वाचन केल्याशिवाय लेखक किंवा कवी घडत नाही असे उदबोधक विचार नुकतेच पद्मश्री जाहीर झालेले ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांनी मसाप च्या व्यासपीठावर मांडले.

महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड आयोजित मराठी भाषा पंधरवडा च्या समारोप प्रसंगी प्रभुणे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषद पिं. चिं.चे अध्यक्ष राजन लाखे, प्रमुख अतिथी अरुण बोऱ्हाडे , कार्याध्यक्ष विनिता ऐनापुरे उपस्थित होते. पद्मश्री मिळाल्या बदल महाराष्ट्र साहित्य परिषद तर्फे मांडलेल्या अभिनंदन ठरावानंतर प्रभुणे यांचा पहिला जाहीर सत्कार करण्यात आला. प्रभुणे पुढे म्हणाले पद्मश्री मिळाल्याचा मला निश्चित आनंद आहे परंतु ज्या समाजाने मला खूप काही दिले त्या समाजाला मला अजून भरपूर द्यायचे आहे. आणि त्यासाठी मी कार्यरत राहील असे भावनोत्कट उदगार प्रगट करून मराठी भाषा संवर्धन साठी सातत्याने उपक्रम राबविणाऱ्या साहित्य परिषदेचे त्यांनी कौतुक केले. प्रभुणे यांचे हस्ते कवयित्री श्यामला पंडित लिखित स्वानंद आणि शब्दझुला या दोन काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले.

भाषा पंधरवडा समारोप कार्यक्रमात कुसुमाग्रज, गदिमा, शांता शेळके, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर यांच्या कविता मावळ टाकवे बुद्रुक शाळेतील साजिरी तापसाळकर, दर्शना ओव्हाळ, अस्मिता ओव्हाळ , तन्वी खळदकर , खुशी खळदकर या विद्यार्थिनींनी “नाच रे मोरा आंब्याच्या वनात,” “टीप टीप पाऊस” , “देणार्‍याने देत जावे घेणार्‍याने घेत जावे” आणि इतर कविता सादर करून रसिकांची मने जिंकली. कवयित्री मंगला पाटसकर यानी या कवितांवर भाष्य करून त्यातले मर्म उलगडून दाखविले. सध्या दूरदर्शनवर सुरू असलेल्या “चंद्र आहे साक्षीला ” या मालिकेच्या मूळ लेखिका विनिता ऐनापुरे यांचा सत्कार करण्यात आला तसेच मराठी भाषा पंधरवडय़ात सर्व कार्यक्रमांना उपस्थितीत राहिल्याबद्दल जयश्री श्रीखंडे आणि संभाजी बारणे या रसिकांचा ही सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास श्रीकांत चौगुले, संजय सिंगलवार शिवा बागुल, माधुरी मंगरूळकर, राजू गवते, इला पवार, दत्तात्रेय डांगे, विनिता श्रीखंडे, रविंद्र झेंडे, डि. एम. कुळकर्णी, अंतरा देशपांडे रमाकांत श्रीखंडे व इतर मान्यवर उपस्थित होते. राजन लाखे यांनी प्रास्ताविक केले संजय जगताप यांनी सूत्रसंचालन केले. डॉ रजनी शेठ, किशोर पाटील माधुरी मंगरूळकर मंगला पाटसकर यांनी कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments