आज निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली. करोनाच्या पार्श्वभूमीवर करोनाच्या नियमावलीचं पालन करूनच या निवडणुका घेण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. तिसरी लाट आणि ओमायक्रॉनची भिती या पार्श्वभूमीवर या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली गेली होती. मात्र, निवडणूक आयोगाने या निवडणुका होणार असल्याचं स्पष्ट केल्यानंतर आज त्यासंदर्भातला कार्यक्रम आयोगाकडून जाहीर करण्यात येत आहे. उत्तर प्रदेश आणि पंजाबच्या निवडणुका टप्प्यांमध्ये होणार असून मणिपूर आणि गोव्याच्या निवडणुका एकाच टप्प्यात होणार आहेत.
कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाने निर्बंध लागू केले आहेत. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा कालावधी एक तासाने वाढण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. मतदान केंद्रावर असणारे सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झालेले असेल. डिजिटल, व्हर्च्युअल पद्धतीने प्रचार करावा, असेही निवडणूक आयोगाने सांगितले. १५ जानेवारीपर्यंत रॅली, सभा, रोड शो, साईकल आणि बाईक रॅलीवर निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. रात्री ८ नंतर निवडणूक प्रचारावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच डोअर टू डोअर प्रचारासाठी पाच लोकांना परवानगी देण्यात आली आहे. प्रचारादरम्यान कोरोना नियमांचं पालन करणे बंधनकारक असेल.
आमची तीन प्रमुख उद्दिष्टे आहेत. पहिलं कोविड सुरक्षित निवडणूक, दुसरं मतदारांना कोणत्याही अडचणीविना मतदानाचा अनुभव आणि तिसरं म्हणजे सर्वाधिक मतदानाची टक्केवारी.
कोणत्या राज्यात कधी मतदान.. ?
उत्तर प्रदेश
पहिला टप्पा – १० फेब्रुवारी रोजी मतदान
दुसरा टप्पा – १४ फेब्रुवारी २०२२ रोजी मतदान
तिसरा टप्पा – २० फेब्रुवारी २०२२ रोजी मतदान
चौथा टप्पा – २३ फेब्रुवारी २०२२ रोजी मतदान
पाचवा टप्पा – २७ फेब्रुवारी २०२२
सहावा टप्पा – ३ मार्च २०२२ रोजी मतदान
सातवा टप्पा – सात मार्च २०२२ रोजी मतदान
पंजाब – 14 फेब्रुवारी 2022
उत्तराखंड – 14 फेब्रुवारी 2022
गोवा – 14 फेब्रुवारी 2022
मणिपूर –
पहिला टप्पा – २७ फेब्रुवारी २०२२
दुसरा टप्पा – तीन मार्च २०२२
मतमोजणीची तारीख १० मार्च असेल.
कोरोना काळात निवडणुका घेणं आव्हानात्मक आहे. 690 विधानसभा जागांवर निवडणुका होणार आहेत. 24.9 लाख मतदार पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. ८० पेक्षा जास्त वय असणारे, दिव्यांग आणि कोरोनाबाधित असणाऱ्यांसाठी पोस्टल बॅलेट वोटिंग असणार असेही सांगण्यात आले. पाच राज्यांच्या निवडणुकीत एकूण 18.34 कोटी मतदार आहेत. त्यापैकी 8 कोटी 55 लाख महिला मतदार आहेत. सर्वच राज्यात महिला मतदारांची संख्या वाढली आहेत, यूपीतली वाढ सर्वाधिक 29 टक्के इतकी आहे. पाच राज्यांच्या या निवडणुकीत उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज ऑनलाइन पद्धतीने दाखल करण्याचाही पर्याय आहे. हा पर्याय बंधनकारक नसेल तर ऐच्छिक आहे. प्रत्येक विधानसभा मतदार केंद्रावर महिलांसाठी महिलांद्वारे संचालित मतदान केंद्र असणार आहे. तसेच दिव्यांग व्यक्तीसाठी मतदान केंद्रावर व्हीलचेअरची सुविधा असणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर मास्क आणि सॅनिटायझेशनची व्यवस्था करण्यात येईल.