देशाने राज्यसभेत आज भावनिक वातावरण पाहावयास मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातून गुलाम नबी आझाद यांच्यातील हळवा माणूस सभागृहाने पाहिला. पंतप्रधान मोदींनाही अश्रू अनावर झाले. मोदींच्या या भाषणानंतर त्या प्रसंगाबद्दलची चर्चा होताना दिसत आहे. त्या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.
काय झालं होतं?
जुलै २००७ मध्ये गुजरातमधून काश्मिरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या यात्रेकरूंच्या बसवर श्रीनगर जवळ दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. यात जवळपास ८ जण जागीच मरण पावले होते. तर काही जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. हा हल्ला झाला त्यावेळी गुलाम नबी आझाद जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री होते. या घटनेनंतरचा एक ह्रदयद्रावक व्हिडीओ असून, त्यात जखमींना मदतीसाठी धावणारे आणि त्यांचं सात्वंन करताना आझाद दिसत आहे. “फुलं-फळं देऊन परत पाठवणार होतो, पण… मुलांचे मृतदेह…. आम्हाला माफ करा”, असं म्हणत आझादांनी हवाई दलाच्या विमानातच हात जोडले. यावेळी त्यांचा कंठही भरून आला होता.
मोदी राज्यसभेत काय म्हणाले?
पंतप्रधान मोदी यांनी गुलाम नबी आझाद यांच्याविषयी बोलताना या घटनेची आठवण सांगितली. “जेव्हा आपण (गुलाम नबी आझाद) मुख्यमंत्री होता. मी पण एका राज्याचा मुख्यमंत्री (गुजरात) म्हणून काम करत होतो. आपले जवळचे संबंध होते. एकदा गुजरातच्या यात्रेकरूंवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. जवळपास ८ लोक मारले गेले होते. त्यावेळी मला गुलाम नबी यांचा सर्वात आधी फोन आला होता. त्यावेळी तो फोन फक्त माहिती देण्यासाठी नव्हता. त्यांचे अश्रू थांबत नव्हते. त्यानंतर मी तत्कालिन संरक्षणमंत्री प्रणव मुखर्जी यांना फोन केला. त्यांना मृतदेह आणण्यासाठी विमान उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्यांनी व्यवस्था करतो असं सांगितलं. त्यानंतर रात्रीही ते विमानतळावर होते. गुलाम नबी यांनी विमानतळावरून पुन्हा कॉल केला. त्यावेळी एखादा माणूस जसा कुटुंबातील व्यक्तीची चिंता करतो, तशीच चिंता ते करत होते. पद, सत्ता जीवनात येत-जात राहते. ती सांभाळता आली पाहिजे. माझ्यासाठी तो फार भावूक क्षण होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी पुन्हा फोन केला आणि विचारलं सगळे लोक पोहोचलेत ना? त्यामुळे मी त्यांच्याविषयी माझ्या मनात आदर आहे,” असं म्हणताना मोदींना अश्रू अनावर झालेले दिसून आले.