हरयाणातील जिंद येथे आज शेतकरी महापंचायतीचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी आसपासच्या गावातून मोठ्या प्रमाणावर शेतकरी गोळा झाले होते. यावेळी नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याने मंच अचानक तुटला आणि त्यावर उपस्थित असलेल्या राकेश टिकैत यांच्यासह इतर शेतकरी नेते खाली कोसळले. यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला मात्र, काही वेळातच पुन्हा महापंचायतीला सुरुवात झाली.
भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत हे मंचावर बोलण्यासाठी उभे राहिले तेवढ्यात अधिकच्या वजनामुळे ते त्यावर उपस्थित लोकांसह कोसळले. त्यानंतर एकच गोंधळ झाल्याने समोर बसलेले शेतकरी देखील उठून उभे राहिले. मात्र, काही वेळातच व्यासपीठ व्यवस्थित केल्यानंतर ते पुन्हा व्यवसपीठावर आले आणि भाग्यवान लोकांचेच व्यासपीठ तुटतात, असं म्हणतं भाषणाला दमदार सुरुवात केली.
जिंद महापंचायतीत पाच प्रस्ताव मंजूर करण्यात आले. हे सर्व प्रस्ताव लोकांनी हात उंचावून मंजूर केले. यामध्ये सर्वात प्रमुख म्हणजे तीन्ही कृषी कायदे रद्द करणे, दुसरा एमएसपीबाबत कायदा करणे, तिसरा स्वामीनाथन आयोग लागू करणे, चौथा दिल्लीमध्ये अटक केलेल्या शेतकऱ्यांना आणि ट्रॅक्टर्सना सोडणे, आणि शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावं, या ठरावांचा यात समावेश होता.