६ जानेवारी २०२०,
श्रीकृष्ण कथेचे श्रवण करून भगवान श्रीकृष्णाच्या गुणांचा आणि त्यांच्या शिकवणुकीप्रमाणे जीवनात आचरण करणे आवश्यक आहे.भारतीय समाजमन सुसंस्कृत बनविणे गरजेचे आहे. पाश्चात्य संस्कृतीचे, तिच्या विचारांचे,आचारांचे अनुकरण करून आपण भारतीय संस्कृतीचा बौद्धीकदृष्ट्या अवमान करीत आहोत, याचे भान प्रत्येकाने ठेवणे गरजेचे आहे,असे मत साध्वी ऋतुंभरा देवी यांनी व्यक्त केले.
उद्योगनगरीतील वसंत ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्यावतीने डेक्कन कॉलेज मैदानावर या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. साध्वी ऋतुंभरा देवी यांनी श्रीकृष्ण कथा प्रवचनाद्वारे ऐकवून वातावरण भक्तीमय झाले. ऋतुंभरा देवींच्या प्रखर वाणीतून श्रीकृष्ण कथा प्रवचन खूप रंगतदार झाले. सलग तीन दिवस चाललेल्या कार्यक्रमात साध्वी ऋतुंभरा देवींनी भगवान श्रीकृष्णाची कथा उलगडून सांगितली. श्रीकृष्ण जन्म, बालपणातील क्रीडा, श्रीकृष्ण-रूक्मिणी विवाहातून जपले गेलेले महत्व सांगितले. श्रीकृष्णाचे जीवनकार्य कथारूपात सांगताना त्यांनी महाभारतातील काही प्रसंगांचे दाखले दिले. हिंदी भाषेतील ओघवत्या शैलीतील प्रवचनामध्ये त्यांनी विविध दृष्टांत, काव्यपंक्ती सांगितल्या. कृष्ण जन्म, छप्पन भोग व बाललीला, रूक्मिणी विवाह उत्सव आणि ब्रिज की होली असे कार्यक्रम यावेळी पार पडले. तीन दिवस चाललेल्या या कार्यक्रमात भाविकांसाठी दररोज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. आलेल्या हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. उद्योजक प्रेमचंद मित्तल हे प्रमुख संयोजक होते. अनिल मित्तल, अरूण मित्तल, सुनील मित्तल यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.
साध्वी ऋतुंभरा देवी मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, धर्म, संरक्षण, जगण्यासाठी अर्थप्राप्ती आणि दानधर्मातून यशप्राप्ती या तीन सुत्रांचा अंगिकार केल्यास सुुसंस्कृत भारतीय नागरिक बनण्याचा मार्ग मोकळा होतो. पवित्र भारतभूमीचे आपण रहिवासी आहोत, याचा नितांत अभिमान बाळगायला हवा. भारतभूमीत ईश्वराचे वास्तव्य आहे. महाराष्ट्रातील भूमीवर जन्मलेले छत्रपती शिवाजी महाराज हे ईश्वरी कृपेचे वारस आहेत. विघातक वृत्तींचा नायनाट करण्याचे महत्वपूर्ण कार्य छत्रपतींनी पार पाडले. जिजामाता या त्यांच्या श्रद्धास़्थान होत्या. भारतीय सैनिक भारतभूमीच्या रक्षणासाठी करीत असलेले कार्य अतुलनीय आहे.