कोरोनामुळे गेल्या वर्षी अनेकांना UPSC परीक्षा देण्यात अडचण आली होती. याचसंदर्भात ज्या विद्यार्थ्यांनी आपला UPSC चा शेवटचा प्रयत्न दिला होता त्यांना या वर्षी आणखी एक संधी मिळणार आहे. त्यासंबंधीतील याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. आता याबाबत तसे प्रतिज्ञापत्रकच केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केलं आहे.
सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकात असं म्हटलं आहे की, गेल्या वर्षी ज्या विद्यार्थ्यांनी आपला UPSC चा शेवटचा प्रयत्न दिला होता त्यांना या वर्षी आणखी एक संधी देण्यास सरकार अनुकुल आहे. त्यामुळे या बद्दलची केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट झाली असून अशा विद्यार्थ्यांना 2021 सालची UPSC परीक्षा देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
वाचाः Gold Price Today: अखेर आज सोन्याचांदीला झळाळी, पाहा काय झाला भाव
या आधी, 25 जानेवारीला केंद्र सरकारने न्यायालयात प्रतिज्ञापत्रक सादर करताना अशा विद्यार्थ्यांना आणखी संधी मिळणार नाही असं सांगितलं होतं. त्यावेळी सदरचे प्रतिज्ञापत्रक हे कनिष्ठ अधिकाऱ्याकडून सादर केलंय आणि UPSC सारख्या महत्वाच्या विषयावर हे अपेक्षित नाही असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा वरिष्ठ स्तरावरुन प्रतिज्ञापत्रक दाखल करावे असा आदेश दिला होता.
आता नवीन प्रतिज्ञापत्रक दाखल करताना केंद्र सरकारने गेल्या वर्षी शेवटचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी मिळावी यासाठी अनुकुलता दर्शवली आहे.