५ जुलै २०२१,
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरही नोकरी न मिळाल्याने तरुणाने आत्महत्या केल्याने सध्या राज्यात खळबळ माजली आहे. स्वप्नील लोणकरने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमधून नैराश्यातून आत्महत्या केल्याचं निष्पन्न झालं आहे. दरम्यान आजपासून सुरु झालेल्या पावसाळी अधिवेशनात एमपीएससीच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. यादरम्यान सरकारकडून एक महत्वाची घोषणा करण्यात आली.
राज्य सरकारकडून एसईबीसी अंतर्गत येणाऱ्या उमेदवारांची मयोवर्यादा ४३ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशोक चव्हाण यांनी विधानपरिषदेत बोलताना ही माहिती दिली. एसईबीसी अंतर्गत येणाऱ्या उमेदवारांची मयोवर्यादा ४३ पर्यंत वाढवली आहे. मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने हा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाने यासाठी मान्यता दिली आहे असं अशोक चव्हाण यांनी सांगितलं.
MPSC च्या सर्व रिक्त जागा ३१ जुलैपर्यंत भरणार – अजित पवार
विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एमपीएससीची सर्व रिक्त पदे ३१ जुलै २०२१ पर्यंत भरण्याची घोषणा केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनी एमपीएससी परीक्षेच्या मुद्द्याकडे सरकारचं लक्ष वेधलं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात उत्तर दिलं. अजित पवार म्हणाले, “सभागृहाचा पहिला दिवस असतानाच विरोधी पक्षनेत्यांनी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण स्वप्निल लोणकर या उमेदवाराच्या आत्महत्येचा मुद्दा उपस्थित केला. ही बाब वेदनादायी आहे. अशी घटना कुणाच्याही बाबतीत घडू नये, अशी सरकारची भूमिका आहे. मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सर्व सहकाऱ्यांशी चर्चा करून यासंदर्भात चर्चा केली,” असं अजित पवार यांनी सांगितलं.