निगडी प्राधिकरण परिसरात भीषण दुर्घटना घडली आहे. बीएसएनएलच्या ‘इन्स्पेक्शन चेंबर’मध्ये (निरीक्षण कक्ष) काम करताना तीन कंत्राटी कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच सेक्टर २७ मधील प्लॉट नंबर ६५ समोर, रस्त्याच्या कडेला ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, तिन्ही कामगार ऑप्टिकल फायबरच्या केबलसाठी चेंबरमध्ये उतरले होते. मृतांमध्ये दत्ता होलारे, लखन धावरे (दोघेही राहणार गुरुद्वारा चौक, आकुर्डी) आणि साहेबराव गिरसेप (रा. बिजलीनगर) यांचा समावेश आहे. हे तिघेही बीएसएनएल आकुर्डी कार्यालयासाठी कंत्राटी पद्धतीने काम करत होते.
महानगरपालिकेने स्पष्टीकरण दिले आहे की, या चेंबरमध्ये महानगरपालिकेचे कोणतेही काम नसून, तेथे बीएसएनएलची केबल असल्याने पालिकेचा त्याच्याशी संबंध नाही.
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, चेंबरमध्ये ऑक्सिजनची कमतरता किंवा विषारी वायूमुळे श्वास घेण्यास त्रास होऊन तिन्ही कामगारांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच निगडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, या घटनेने सामाजिक आणि राजकीय वर्तुळात संताप व्यक्त करण्यात येत आहे. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असताना कामगारांना कामावर का बोलावले गेले? काम करताना आवश्यक सुरक्षात्मक साधने का पुरवली गेली नाहीत? अशा अनेक प्रश्नांची चर्चा सुरू आहे. संबंधित कंपनी व ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.


