हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे नागपूरपर्यंतचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. सध्या बुलडाणा आणि वाशिम येथील काम सुरू असून मेअखेरपर्यंत हा महामार्ग नागरिकांसाठी खुला करण्याचा सरकारचा मानस असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या महामार्गाचे प्रलंबित काम लवकरात लवकर पूर्ण करावे, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी दिले.
समृद्धी महामार्गाच्या कामाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी आढावा घेतला. यावेळी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव वित्त मनोज सौनिक, व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत पुलकुंडवार आदी उपस्थित होते. या महामार्गाच्या दुतर्फा आणि दुभाजकांवर देशी झाडे असावीत तसेच या वृक्षराजीमुळे प्रवास सुखकर व नयनरम्य व्हावा, याविषयी मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्याचे कळते. यावेळी महामार्गाच्या कामांचे सादरीकरणही करण्यात आले.