१८ जानेवारी २०२०
सुधारित नागरिकत्व कायद्याला होणारा विरोध हा चिंतेचा विषय नाही असंही भागवत यांनी म्हटलं आहे.
सरसंघचालक मोहन भागवत यांच्या मते CAA अर्थात सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन मागे हटण्याची गरज नाही . हा चिंतेचा विषय नसल्याचं भागवत यांनी म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुरादाबादमध्ये मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांना काही लोक CAA वरुन जनतेत भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. हा भ्रम जनतेच्या मनातून दूर केला जावा ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे असं आवाहनही त्यांनी वक्तव्य केल्याची माहिती समोर आली आहे.
CAA, NRC या मुद्द्यांवरुन देशातल्या काही राज्यांमध्ये गदारोळ सुरु आहे. महाराष्ट्रातही सुधारित नागरिकत्व कायदा लागू होऊ देणार नाही असं छगन भुजबळ यांनी गेल्या आठवड्यात म्हटलं होतं. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही CAA ला कडाडून विरोध दर्शवला आहे. या विरोधात आंदोलनंही करण्यात आली. तसंच CAA च्या समर्थनार्थही आंदोलनं करण्यात आली. CAA हा देशहिताचा कायदा नाही असं विरोधकांचं म्हणणं आहे.
सुधारित नागरिकत्व कायदा देशात लागू झाला आहे. उत्तर प्रदेश हे या कायद्याची अमलबजावणी करणारं पहिलं राज्य ठरलं आहे. लोकांच्या मनातून सुधारित नागरितत्व कायद्याबद्दलचा हा संभ्रम त्यांच्या मनातून दूर करणं हे आपलं काम आहे असंही मोहन भागवत यांनी म्हटलं आहे . तसेच देशात दोन मुलं जन्माला घालण्याचा कायदा अस्तित्त्वात यायला हवा असंही म्हटलं आहे.