३ फेब्रुवारी २०२१,
पुण्यात काही दिवसांपूर्वी आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेत शरजील उस्मानी याने धार्मिक भावना दुखावणारं वक्तव्य केलं होतं. याप्रकरणी मोठी टीका झाल्यानंतर आता स्वारगेट पोलीस ठाण्यात शरजील याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यात गेल्या काही वर्षांपासून घेण्यात येत असलेली एल्गार परिषद ही नेहमीच वादात सापडली आहे. त्यातच यंदाही शरजील उस्मानी या तरुणाच्या एका वक्तव्याने मोठा वाद निर्माण झाला. आजचा हिंदू समाज पूर्णत: सडलेला आहे, असं आक्षेपार्ह वक्तव्य शरजील याने एल्गार परिषदेत बोलताना केलं.
या मुद्द्यावरून भाजपने राज्य सरकारला धारेवर धरत शरजील उस्मानी याच्याविरोधात कारवाई करण्यात मागणी केली होती. त्यानंतर आता अखेर शरजीलविरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुण्यातील एल्गार परिषदेत शरजील उस्मानी याने हिंदू समाजाबद्दल केलेली अवमानजनक, आक्षेपार्ह, गंभीर वक्तव्यांची तातडीने दखल घेऊन त्यावर राज्य सरकारतर्फे तातडीने आणि कठोरातील कठोर कारवाई करावी,’ अशी मागणी करणारे पत्र माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं होतं.
पुणे येथे आयोजित एल्गार परिषदेत अलिगड मुस्लीम विद्यापीठातील माजी विद्यार्थी असलेल्या शरजील उस्मानी याने अतिशय गंभीर, धार्मिक तेढ वाढविणारे, आक्षेपार्ह आणि समस्त हिंदू समाजाचा अपमान करणारी विधाने केली आहेत. आजचा हिंदू समाज पूर्णत: सडलेला आहे, हिंदू समाज हत्या करतो, घरी जाऊन आंघोळ करतो, दुसर्या दिवशी पुन्हा हत्या करतो, अशाप्रकारची ही गंभीर विधाने आहेत,’ असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या प्रकरणाबाबत संताप व्यक्त केला होता.