२१ सप्टेंबर २०२०,
आज (सोमवारी) संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आठवा दिवस आहे. रविवारी कृषि विषयक विधेयकांवरून राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या आणि धक्काबुक्की करणाऱ्या आठ खासदारांवर राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी निलंबनाची कारवाई केलीय. यानंतर सभागृहाचं कामकाज १०.०० वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं. १० वाजता सभागृहाचं कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर पुन्हा खासदारांनी घातलेल्या गोंधळामुळे कामकाज १०.३६ पर्यंत स्थगित करण्यात आलं.
कृषि विषयक विधेयकांवरून रविवारी राज्यसभेत विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला होता. या गोंधळावर सभापती व्यंकय्या नायडून यांनी नाराजी व्यक्त करत या घटनेची निंदा केली. उपसभापती हरिवंश यांच्यासमोर गैरवर्तन केल्याबद्दल सभापती व्यंकय्या नायडू यांनी आठ खासदारांना एका आठवड्यासाठी सदनाच्या कामकाजातून निलंबित केलंय.
निलंबित करण्यात आलेल्या खासदारांमध्ये आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह, तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांचाही समावेश आहे. याशिवाय राजू सातव, के के रागेश, रिपून बोरा, डोला सेन, सय्यद नझीर हुसैन आणि एलामारन करिम यांचाही निलंबित खासदारांमध्ये समावेशी आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनच्या सातव्या दिवशी (रविवारी) राज्यसभेत कृषि विधेयकांवर चर्चा आणि मतदान सुरू असताना विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला. विधेयकं संमत करून घेण्यासाठी उपसभापतींनी राज्यसभेचं कामकाजाची वेळ वाढवली. यावर, उपसभापतींच्या निर्णयावर खासदारांनी जोरदार आक्षेप घेत सभागृहात तोडफोडही केली. खासदारांनी सभागृहातच नियम पुस्तिका फाडली तसेच माईकही तोडण्यात आला. ‘विधेयकांवर चर्चा सरकारला नकोय. त्यांना केवळ लवकरात लवकर ही विधेयकं मंजूर करायची आहेत. ही विधेयकं आणण्यापूर्वी विरोधकांशी संवाद साधणं गरजेचं होतं. करोनाच्या नावावर अध्यादेश काढले गेले. सरकारनं भारतीय मजूर संघालाही विश्वासात घेतलेलं नाही’ असा आरोप विरोधी खासदारांकडून करण्यात आला. या गोंधळातच आवाजी मतदानाद्वारे कृषि विषयक दोन विधेयके मंजूर करण्यात आली.