अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. कारण अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र (पीसीएम) या विषय गटाचे शिक्षण बारावीला न घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही प्रवेशाची संधी मिळू शकणार आहे. बारावीला पीसीएम ऐवजी इतर विज्ञान विषयांतील शिक्षण घेणारे विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरतील.
नव्या नियमांनुसार विज्ञान शाखेतील माहिती तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, जीवशास्त्र हे विषय बारावीला अभ्यासणारे विद्यार्थीही अभियांत्रिकी प्रवेशासाठी पात्र ठरणार आहेत. देशभरातील तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांचे नियमन करणाऱ्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) अभियांत्रिकी पदवी आणि पदविका अभ्यासक्रमाच्या पात्रता निकषांत बदल केले आहेत.
तसेच गणित, भौतिकशास्त्र हे विषय अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचा पाया मानला जातो. त्यामुळे बारावीला या विषयांचे शिक्षण न घेता अभियांत्रिकीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाने स्वतंत्र मार्गदर्शन वर्ग (ब्रिज कोर्स) घ्यावेत अशी सूचना परिषदेने दिली आहे.
अभियांत्रिकीचे प्रवेश हे राष्ट्रीय किंवा राज्याच्या स्तरावरील स्वतंत्र प्रवेश परीक्षेच्या माध्यामातून करण्यात येतात. या प्रवेश परीक्षा गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या विषयांवर आधारित असतात. बारावीला विज्ञान शाखेतील कोणतेही विषय शिकण्याचे स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना मिळाले असले तरीही प्रवेश परीक्षांमध्ये बदल झालेला नाही. त्यामुळे प्रवेश परीक्षांसाठी गणित, भौतिकशास्त्राचा अभ्यास करावाच लागणार आहे.