१ जुलै २०२१
मुंबई-पुणे जुन्या रस्त्यावरील टोल तात्काळ बंद करण्यात यावा अशी, मागणी करण्यात आली आहे. तळेगाव-दाभाडे येथील रहिवाशी किशोर आवारे आणि मिलिंद अच्युत यांनी ही मागणी केली आहे. मुंबई-पुणे जुन्या रस्त्यावर अजूनही सुरु असलेली टोल वसुली बेकायदेशीर आहे. यामुळे ही वसुली तात्काळ थांबवण्यात यावी, अशी या रहिवाशांची मागणी आहे.
मुंबई-पुणे जुना रस्ता दुरुस्तीबाबत MSRDC आणि केंद्र सरकार यांच्यात 14 मे 2004 रोजी करार झाला होता. यानंतर दुसऱ्या दिवशी एमएसआरडीसीने या रस्त्याच्या कामासाठी 286 कोटी रुपये मंजूर करुन हे काम आयआरबी या कंपनीला दिलं होतं. या बदल्यात आयआरबी कंपनीला 1461 कोटी रुपये वसूल करण्याचे अधिकारही एमएसआरडीसीने दिले होते. मात्र गेल्या 15 वर्षात आयआरबीची रक्कम केव्हाच वसूल झाली आहे, असा दावा रहिवाशांनी केला आहे.
ऑगस्ट 2019 मध्येच एवढे पैसे (1461 कोटी रुपये) वसूल झाले आहेत. आतापर्यंत 2000 कोटी रुपये वसूल झाले असावेत. त्यामुळे मुंबई-पुणे जुन्या रस्त्यावरील टोल तात्काळ बंद करावा, असं तक्रारदारांचं म्हणणं आहे. आमच्या निवेदनाचा विचार करावा, अन्यथा आम्हाला कोर्टात जाऊन दाद मागावी लागेल, असं आवारे आणि अच्युत यांचे वकील प्रवीण वाटेगावकर यांनी सांगितलं.
दरम्यान, पुणे बंगळुरु महामार्गावरच्या टोलनाक्यांवरही दरवाढ करण्यात आली आहे. कोल्हापूर-सातारा दरम्यान दोन्ही टोल नाक्यांवर टोलवाढ करण्यात आली आहे. किणी, तासवडे टोलनाक्यांवर प्रत्येकी 5 रुपयांपासून 25 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. नव्या दरवाढीची मध्यरात्रीपासून अंमलबजावणी करण्यात आली आहे.