मातोश्री येथे पदाधिकाऱ्यांसह प्रवेश; सामाजिक कार्याच्या बळावर शहराच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या अपना वतन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सिद्दीकभाई शेख यांनी आज मुंबईतील मातोश्री येथे आपल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात अधिकृत प्रवेश केला. पक्षाचे ज्येष्ठ नेते विनायक राऊत, खासदार संजय राऊत, संपर्कप्रमुख लतिका पास्ते, पुणे सल्लागार रमेश जाधव आणि पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष चेतन पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.
सन २०१५ मध्ये स्थापन झालेल्या अपना वतन संघटनेच्या माध्यमातून सिद्दीकभाई शेख यांनी संविधानिक मूल्यांवर आधारित जनप्रबोधन, सामाजिक न्याय, राष्ट्रीय एकात्मता, भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलने तसेच महिला, कामगार आणि वंचित घटकांच्या प्रश्नांवर सातत्याने लढा उभारला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीपुरवठा, रस्ते, पुनर्वसन, अवैध धंद्यांविरोधातील कारवाई, पर्यावरण संवर्धन, सरकारी रुग्णालयांतील सुविधा, शिक्षण, महिला सुरक्षा, कामगारांचे प्रश्न आणि नागरिकांच्या विविध मूलभूत समस्यांवर त्यांनी अनेक आंदोलने व पाठपुरावा केला आहे. त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल त्यांना युवा भूषण, समाजभूषण, संविधान प्रचारक, दलित पँथर, शांतता पुरस्कार, महात्मा बसवेश्वर पुरस्कार यांसह अनेक प्रतिष्ठेचे सन्मान प्राप्त झाले आहेत.
राजकीय वर्तुळात या पक्षप्रवेशाची चर्चा रंगली असून, अपना वतन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह झालेला हा प्रवेश आगामी स्थानिक राजकारणासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. विविध समाजघटकांमध्ये असलेला संपर्क, जनआंदोलनातील सक्रिय नेतृत्व आणि सामाजिक कार्याचा दीर्घ अनुभव यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला पिंपरी-चिंचवडमध्ये नव्या बळाची साथ मिळू शकते, असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे.
यावेळी सिद्दीकभाई शेख यांच्यासमवेत संघटनेच्या महिला अध्यक्षा राजश्री शिरवळकर, राजू शेरे, जितेंद्र जुनेजा, तौफिक पठाण, हाजीमलंग शेख, सलीम शेख, सादिक शेख, मोरेश्वर घाडगे, विशाल गांधले यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला.
“समाजहिताच्या लढ्याला अधिक व्यापक व्यासपीठ मिळावे”
पक्षप्रवेशानंतर सिद्दीकभाई शेख म्हणाले, “आजचा पक्षप्रवेश हा कोणत्याही पदासाठी नसून समाजहित, संविधानिक मूल्ये आणिजनतेच्या न्यायाच्या लढ्याला अधिक व्यापक व्यासपीठ मिळावे या उद्देशाने केला आहे. गेली अनेक वर्षे आम्ही सामान्य नागरिकांच्याप्रश्नांसाठी संघर्ष केला आहे. आता आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ही लढाई अधिक ताकदीने पुढे नेण्याचाआमचा निर्धार आहे. जात–धर्माच्या पलीकडे जाऊन सर्वसामान्य नागरिक, शोषित–वंचित, महिला, युवक आणि कामगार यांच्याप्रश्नांसाठी आम्ही पूर्वीप्रमाणेच निस्वार्थपणे काम करत राहू. जनतेचा विश्वास हीच आमची खरी ताकद असून तो विश्वास कायमराखण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”


