३ डिसेंबर २०२०
अनेक बड्या कंपन्या मधाच्या नावाखाली साखरेचा पाक विकत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सेंटर फॉर सायन्स अँड एनवायरमेंटनं (CSE) केलेल्या तपासातून ही बाब उघड झाली आहे. सर्वाधिक मध तयार करणाऱ्या कंपन्या मधामध्ये साखर मिसळत असल्याचं या तपासाद्वारे समोर आलं आहे. सीएसईनं १३ छोट्या मोठ्या कंपन्यांच्या मधाचे नमूने तपासले. या कंपन्यांच्या मधात ७७ टक्क्यांपर्यंत भेसळ असल्याचं दिसून आलं. मधाच्या २२ मापदंडांपैकी काही कंपन्या केवळ ५ मापदंडांमध्ये खऱ्या उतरल्याचं माहिती देण्यात आली.
सीएसईनं केलेल्या अभ्यासात पतंजली, डाबर, बैद्यनाथ, झंडू, हितकारी आणि एपिस हिमालयसारख्या कंपन्यांचा मध शुद्धतेचं प्रमाण तपासणाऱ्या न्युक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स (NMR) या चाचणीत अयशस्वी ठरले. परंतु डाबर आणि पतंजलीनं या चाचणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. दरम्यान, कंपनीची प्रतीमा मलिन करण्याचा या चाचणीमागील प्रयत्न असल्याचं या कंपन्यांचं म्हणणं आहे. आम्ही भारतात नैसर्गिक रित्या मिळणारा मधच एकत्र करतो आणि त्याची विक्री करतो, असा दावाही या कंपन्यांकडून करण्यात आला आहे.
दरम्यान, यामध्ये फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटीच्या (FSSAI) नियमांचं योग्यरित्या पालन करण्यात आल्याचं कंपन्यांनी म्हटलं आहे. “आमच्या कंपनीचा मध १०० टक्के शुद्ध आहे. तसंच जर्मनीमध्ये झालेल्या एमएमआर चाचणीतही तो यशस्वी ठरला होता. आम्ही ठरवण्यात आलेले २२ मापदंड पूर्ण करतो. नुकताच जो अहवाल समोर आला तो प्रायोजित असल्याचं वाटत आहे,” असं डाबरच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आलं.
“आम्ही १०० टक्के नैसर्गिक मध तयार करतो. प्रक्रिया केलेल्या मधाला अधिक प्रमोट केलं जावं यासाठी नैसर्गिकरित्या मध तयार करणाऱ्या कंपन्यांच्या बदनामीचा हा प्रयत्न आहे,” अशी प्रतिक्रिया पतंजलीचे आचार्य बालकृष्ण यांनी दिली. यापूर्वी एफएसएसआयनं देशात आयात केला जाणारा मध गोल्डन सिरप, इनव्हर्ट शूगर सिरप आणि राईस सिरपची भेसळ करून विकला जात असल्याचं आयातदारांना आणि राज्यांच्या खाद्य आयुक्तांना सांगितलं होतं. दरम्यान सीएसईच्या टीमनं याची माहिती घेतली असता एफएसएसएआयनं ज्या गोष्टींची भेसळ होत असल्याची माहिती दिली होती ती उत्पादनं आयात केली जातच नसल्याचं समोर आलं. चीनमधील कंपन्या फ्रक्टोजच्या रूपात हे सिरप भारतात पाठवतात.
“२००३ आणि २००६ मध्ये सॉफ्ट ड्रिंकच्या केलेल्या तपासणीत त्यात जी भेसळ दिसून आली त्यापेक्षा भयानक भेसळ ही मधात केली जात आहे. ही भेसळ आपल्या शरीराला अपायकारक आहे. ज्या १३ मोठ्या कंपन्यांच्या मधाचे नमूने तपासले गेले त्यापैकी १० एनएमआर चाचणीत अयोग्य ठरले. या १० पैकी ३ नमूने भारतीय मापदंडानुसारही नव्हते,” अशी माहिती सीएसईच्या महासंचालक सुनीता नारायण यांनी दिली