आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात तीन दिवस पुरेल इतकाच लसींचा साठा शिल्लक असल्याची माहिती दिली आहे. केंद्राकडून गरज आहे तितक्या वेगाने लसींचा पुरवठा होत नसल्याची तक्रारही त्यांनी केली आहे. यानंतर कोरोना आटोक्यात आणण्यात आलेल्या अपयशावरून लक्ष विचलित करण्यासाठी काही राज्ये लशीचा तुटवडा असल्याची नाहक भीती निर्माण करत असल्याचं म्हणत केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांना उत्तर दिलं आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
“महाराष्ट्र सरकार आपलं अपयश लपवत नाही. या बाबतीत राजेश टोपेच जास्त सांगू शकतील. पण महाराष्ट्राला कमी लेखण्याचा, संकटात आणण्याचा, बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. आम्हाला हर्षवर्धन यांच्याकडून आम्हाला ही अपेक्षा नव्हती. महाराष्ट्र सरकार काय करत आहे याची दखल जागतिक आरोग्य संघटनादेखील घेत आहे. गुजरात हायकोर्टानेही दखल घेतली आहे. महाराष्ट्र एक मोठं राज्या असून सर्वात जास्त दबाव आहे. आर्थिक, लस, वाढती रुग्णसंख्या अशा अनेक गोष्टींचा दबाव आहे. केंद्र आणि राज्याने एकमेकांवर टीका-टिप्पणी न करता जनतेची सेवा केली पाहिजे,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
लशींचा तुटवडा असल्यासंदर्भात महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींकडून केली गेलेली विधाने म्हणजे कोरोना आटोक्यात आणण्यामध्ये राज्य सरकारला आलेल्या अपयशापासून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळण्याचा प्रयत्न असल्याचे दिसते. ‘वैयक्तिक वसुली’साठी करोनाबाधित व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरणातून बाहेर पडण्याची मुभा दिली जाते. नियम मोडून राज्य सरकार अख्ख्या महाराष्ट्राला संकटाच्या खाईत लोटत आहे. महाराष्ट्र एकामागून एक संकटाचा सामना करत असताना राज्य नेतृत्वाने मात्र डोळे मिटून घेतले आहेत, अशी टीका हर्षवर्धन यांनी केली होती.