१० मार्च २०२१,
अलिगढ विद्यापीठातील माजी विद्यार्थी नेता शर्जिल उस्मानी हा तपासात सहकार्य करत असल्यास त्याच्यावर पुढील सुनावणीपर्यंत कठोर कारवाई नको, असे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने शर्जिलला मंगळवारी दिलासा दिला. एल्गार परिषदेच्या ३० जानेवारीला पुण्यात पार पडलेल्या कार्यक्रमात हिंदू धर्माबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करून सामाजिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी दाखल झालेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी शर्जिलने याचिका केली आहे.
न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठासमोर शर्जिलच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. पुणे पोलिसांनी शर्जिलला समन्स बजावले असून मंगळवारी सकाळी १० वाजता त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. शर्जिलही या चौकशीसाठी हजर राहणार असल्याची माहिती त्याचे वकील मिहीर देसाई यांनी न्यायालयाला दिली. मात्र चौकशीसाठी गेल्यावर त्याला तेथेच अटक केली जाण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली. त्यावर शर्जिल तपासात सहकार्य करत असेल तर त्याच्यावर तूर्त कठोर कारवाई नको, असे न्यायालयाने म्हटले आहे. त्याच्यावर पुढील सुनावणीपर्यंत कठोर कारवाई केली जाणार नाही, अशी तोंडी हमी सरकारी वकील जयेश याज्ञिक यांनी दिल्यावर न्यायालयाने शर्जिलला बुधवारी पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहून तपासात सहकार्य करण्याचे आदेश दिले.
दरम्यान, या प्रकरणी मूळ तक्रार करणाऱ्याला प्रतिवादी करण्याचे आदेश न्यायालयाने शर्जिलला दिले. आपल्या वक्तव्यानंतर कोणत्याही प्रकराची हिंसा झालेली नाही किंवा सामाजिक सलोखा बिघडलेला नाही. त्यामुळे दाखल गुन्हा हा आधारहीन आहे, असा दावा शर्जिलने केला.