इर्शाळवाडीमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही बचाव कार्य सुरू आहे. याचदरम्यान मोठी बातमी समोर आली आहे. आणखी दोन मृतदेह सापडले असून, मृतांचा आकडा 19 वर पोहोचला आहे.
इर्शाळवाडीमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही बचाव कार्य सुरू आहे. याचदरम्यान मोठी बातमी समोर आली आहे. आणखी दोन मृतदेह सापडले असून, मृतांचा आकडा 19 वर पोहोचला आहे. आजही या परिसरात पाऊस सुरू असल्यानं बचाव कार्यात अनेक अडथळे निर्माण होत आहेत. मात्र तरीदेखील एनडीआरएफच्या जवानांनी बचाव कार्य सुरूच ठेवलं आहे.
रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीमध्ये बुधवारी रात्री साडेदहा ते आकराच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली. गावावर दरड कोसळली. या घटनेत गावातील अनेक जण मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफची पथक घटनास्थळी दाखल झालं. तातडीनं बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली. या घटनेत आतापर्यंत 19 जणांनी आपला जीव गमावला आहे. अद्यापही 60 पेक्षा अधिक जण मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
आज बचाव कार्याचा दुसरा दिवस आहे. एनडीआरएफचे जवान भर पावसात मातीचा ढिगारा दूर करत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. पावसामुळे बचाव कार्यात अडथळा निर्माण होत आहे. याचदरम्यान आज एकाच जागी दोन मृतदेह आढळल्यानं मृतांचा आकडा 19 वर पोहोचला आहे.