मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा बेमुदत उपोषणासाठी बसलेल्या मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज (३० ऑक्टोबर) सहावा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे. मात्र, मराठा आरक्षणाची मागणी मान्य झाल्याशिवाय आपण पाणी, उपचार काहीही घेणार नसल्याची भूमिका मनोज जरांगेंनी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर नांदेडमधून एक महिला आंदोलक आपल्या आजारी मुलासह अंतरवाली सराटी येथे आल्या आणि जरांगेंची प्रकृती पाहून हंबरडा फोडला. यावेळी त्यांनी जरांगेंना काही झाल्यास मी विष पिऊन जीव देऊन, असा इशाराही दिला.
महिला आंदोलक म्हणाल्या, “आरक्षण मिळेल, पण मनोज जरांगेंची एक एक पेशी तुटून ते मरायला लागले आहेत. त्यामुळे आत्ता त्यांना उपचाराची गरज आहे. आपण आज ना उद्या सरकारकडून आरक्षण घेणारच आहोत. परंतु आता आपण बघ्याची भूमिका घेणं म्हणजे आपला अतिशय नालायकपणा आहे, अतिशय मुर्खपणा आहे. आपण मनोज जरांगेंचा जीव गेल्यावर आरक्षण घ्यायचं का?”
“मनोज जरांगे आपल्यासमोर तडफडून मरत असतील, तर आपण…”
“आरक्षण बघण्यासाठी मनोज जरांगे जीवंत पाहिजे. त्यांनी तपासणीसाठी आणि उपचारासाठी नकार दिला आहे. मात्र, ते आपल्यासमोर जीव देत असतील, तडफडून मरत असतील, तर आपण सर्व बांधवांनी आणि शासनाने ते कसे तडफडून मरत आहेत हे बघायचं का? सरकारला तर त्यांचा जीवच घ्यायचा आहे हे स्पष्ट झालं आहे,” असा आरोप या महिला आंदोलकाने केला.
“…म्हणजे त्यांना माझ्या भावाचा जीव धोक्यात टाकायचा होता”
या महिला आंदोलक पुढे म्हणाल्या, “सरकारला वेळ देऊनही त्यांनी काहीच केलं नाही. ४० दिवसात सरकारने काही प्रयत्न केल्याचं ऐकलं आहे का? विधीमंडळात बैठक घेतली नाही, केंद्रात बैठक घेतली नाही. यांना फक्त पुराव्यांच्या आधारे संसदेत आणि विधीमंडळात विधेयक पारित करायचं होतं. त्यांनी ते केलं नाही. म्हणजे त्यांना माझ्या भावाचा जीव धोक्यात टाकायचा होता.”
“…अन्यथा मी विष पिऊन मरेन”
“मी माझ्या भावाला असं बघू शकत नाही. तुम्ही प्लिज माझ्या भावाचा जीव वाचवा, अन्यथा मी विष पिऊन मरेन. त्यांना दवाखान्यात घेऊन जा. त्यांची तब्येत खूप गंभीर होत आहे. मी खूप रुग्ण हाताळले आहेत. मला माहिती आहे. त्यांच्यात अजिबात त्राण राहिलेले नाही. ते हात हलवत आहेत, पाय हलवत आहेत, बोलत आहेत म्हणजे त्यावरून तुम्ही असं समजू नका की त्यांची तब्येत चांगली आहे,” अशी माहिती या आरोग्यसेविका असलेल्या महिला आंदोलकाने दिल्या.