पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी, जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या आषाढी पालखी सोहळ्याला काल (७ जुलै) देहू येथून भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. पहिल्या दिवसाचा पारंपरिक मुक्काम देहूतील इनामदार वाड्यात झाल्यानंतर आज (८ जुलै) पालखी पिंपरी-चिंचवड शहरात दाखल होणार असून, वारकऱ्यांच्या स्वागतासाठी शहर सज्ज झाले आहे.
काल पहाटेपासून देहूनगरीत हजारो वारकरी, दिंड्या आणि भाविकांची उपस्थिती होती. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार सुप्रिया सुळे, युवराज संभाजीराजे छत्रपती, संयोगिताराजे छत्रपती तसेच खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते वेदमंत्रोच्चारात पादुकांचे महापूजन व कलशपूजन करण्यात आले. त्यानंतर “ज्ञानोबा-तुकाराम”, “पुंडलिका वरदे हरी विठ्ठल” आणि “रामकृष्ण हरी”च्या जयघोषात पालखीने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले.
मुसळधार पावसामुळे काही दिवसांपासून निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे पालखी सोहळ्याबाबत चिंता व्यक्त होत होती. मात्र प्रस्थानाच्या दिवशी पावसाने विश्रांती घेतल्याने सर्व धार्मिक विधी निर्विघ्नपणे पार पडले. रिमझिम सरी, टाळ-मृदुंगाचा निनाद आणि इंद्रायणीच्या तीरावर उसळलेला भक्तीचा उत्साह यामुळे संपूर्ण देहूनगरी भक्तिमय वातावरणाने भारावून गेली.
आज पालखीचे पिंपरी-चिंचवड शहरात आगमन होत असून आकुर्डी येथे मुक्काम होणार आहे. पालखीच्या स्वागतासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका, पोलीस प्रशासन, विविध सामाजिक संस्था, दिंडी मंडळे आणि वारकरी संघटनांकडून व्यापक तयारी करण्यात आली आहे. पालखी मार्गावर स्वच्छता, पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, वाहतूक नियोजन, सुरक्षा व्यवस्था तसेच वारकऱ्यांसाठी विविध सेवांची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
शहरातील विविध चौक, रस्ते आणि पालखी मार्ग भगवे ध्वज, स्वागत कमानी आणि आकर्षक सजावटीने नटले असून वारकऱ्यांच्या स्वागतासाठी नागरिकांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत आज पिंपरी-चिंचवड शहर भक्तीमय वातावरणाने दुमदुमून जाणार आहे.


