३ मार्च २०२१,
शिवसेनेचे नेते संजय राठोड यांचं पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नाव आल्यानंतर विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरत राठोडांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर राठोडांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे राजीनामा सोपावला होता. मात्र, राठोड यांचा राजीनामा अद्याप राज्यपालांकडे पोहोचलाच नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळं राठोड यांच्या राजीनाम्याचे पुढे काय झालं?, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
सोशल मीडिया स्टार पूजा चव्हाण हिनं पुण्यात आत्महत्या केल्यानं मोठी खळबळ माजली होती. त्यानंतर सोशल मीडियावर काही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या. या ऑडिओ क्लिपमधील आवाज संजय राठोड यांचा असल्याचा आरोप करत भाजपनं कारवाईची मागणी केली होती. भाजपनं संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता तसंच, अधिवेशन चालू न देण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राठोडांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते.
बीडमधील पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यात तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. या प्रकरणाशी वनमंत्री संजय राठोड यांचा संबंध असल्याचा आरोप करत भाजपानं राजीनामा घेऊन कारवाई करण्याची मागणी केली होती. अधिवेशन चालू न देण्याचा इशारा भाजपानं दिला होता. पूजा चव्हाण प्रकरणावरून विरोधकांकडून कोडीं होण्याची शक्यता असल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते.