२० जानेवारी २०२०,
शिर्डी ग्रामस्थांचं शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीत अखेर वादावर पडदा पडला आहे. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पाथरी हे साईबाबांचं जन्मस्थळ असल्याचं वक्तव्य मागे घेतलं. तसंच पाथरीचा विकास तीर्थक्षेत्र म्हणून करणार असं आश्वासन दिल्यानंतर शिर्डीकरांनी आंदोलन मागे घेतलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी साईबाबांचा जन्म पाथरी या ठिकाणी झाला हे वक्तव्य केलं होतं. त्यावरुन बराच वाद निर्माण झाला होता. आज अखेर त्या वादावर पडदा पडला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाथरीचा उल्लेख साईबाबांचे जन्मस्थळ असा करून पाथरीसाठी विकास योजना जाहीर केली होती. त्यामुळे वादाला तोंड फुटले होते. पाथरी नव्हे तर शिर्डी हेच साईबाबांचे जन्मस्थळ असल्याचे सांगत शिर्डीकरांनी बेमुदत शिर्डी बंद पुकारला होता. याप्रश्नी चर्चेअंती तोडगा काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्याचवेळी बंद मागे घेण्याची विनंतीही मुख्यमंत्र्यांनी केली होती. या विनंतीला मान देत शिर्डीकरांनी रविवारी रात्री बंद मागे घेतला होता. दरम्यान, या प्रश्नावर आज मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात तातडीने बैठक घेतली व वादावर यशस्वी तोडगा काढला.
शिर्डी व पाथरीकरांनी आजच्या बैठकीत सामोपचाराची भूमिका घेतली. साईबाबांचे जन्मस्थळ म्हणून नाही तर तीर्थक्षेत्र म्हणून पाथरीचा विकास होणार असेल तर त्यास आमची कोणतीही हरकत नाही, अशी भूमिका शिर्डीतील ग्रामस्थ प्रतिनिधींनी बैठकीत मांडली. ही भूमिका दोन्ही बाजूने मान्य झाली. मुख्यमंत्र्यांनीही पाथरीचा साईबाबांचे जन्मस्थळ हा उल्लेख मागे घेतला. ‘पाथरी तीर्थक्षेत्र विकास’ हे नाव योजनेसाठी निश्चित झाले आणि वाद संपुष्टात आला. ग्रामस्थांचे प्रतिनिधी म्हणून बैठकीसाठी उपस्थित राहिलेले खासदार सदाशिव लोखंडे यांनी बैठकीबाबत समाधान व्यक्त केले. शिर्डीकरांच्या बाजूने हा वाद आता संपला आहे, असे त्यांनी सांगितले.
Shri Saibaba Sansthan Trust delegation representative&Shiv Sena leader Kamlakar Kothe: Chief Minister Uddhav Thackeray has accepted our demands. People of Shirdi are satisfied with what he said. He has assured us that no new dispute will be created & we are ending the matter. https://t.co/CUaJkrjxEd pic.twitter.com/jLbHvEzWGV
— ANI (@ANI) January 20, 2020
पाथरी हे साईबाबांचे जन्मस्थळ आहे की नाही, हे मला माहिती नाही. मी काही संशोधक नाही. जी माहिती मिळाली त्यानुसार मी बोललो. मात्र, बंद पुकारण्यापूर्वी तुम्ही माझ्याशी बोलायला हवे होते. आता जन्मस्थळाचा कोणताही वाद काढू नका. पाथरीला तीर्थक्षेत्र विकास म्हणून निधी देऊ. राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मला सर्व जनता सारखीच. आपण सर्वजण साईबाबांसमोर नमूया, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत दोन्ही बाजूच्या ग्रामस्थांना केले. शिष्टमंडळात ४० प्रतिनिधींचा समावेश होता.