रशिया-युक्रेन युद्धामुळे युक्रेनमध्ये १८ हजारांवर भारतीय अडकले आहेत. आता या भारतीयांना सुरक्षित मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारने योजना आखली आहे. या योजनेनुसार एअर इंडियाचे विमान रोमानियाच्या बुखारेस्टमध्ये दाखल झाले आहे. या विमानाने आज पहाटे मुंबईहून उड्डाण केले होते. रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी सुरक्षेचं आश्वासन दिल्यानंतर भारताने मोहीम उघडली आहे.
एअर इंडियाचे Boeing 787 जातीचे AI-1943 क्रमांकच्या विमानाने आज पहाटे मुंबईहून ३ वाजून ४० मिनिटांनी उड्डाण केले. हे विमान रोमानियाच्या बुखारेस्टमध्ये सुरक्षितपणे उतरले. यानंतर भारतीय नागरिकांना घेऊन या विमानाने मुंबईसाठी उड्डाण केले आहे. या विमानात २१९ भारतीय आहेत. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ही माहिती दिली आहे. एएनआयने हे वृत्त दिलं आहे.
युक्रेनमधून सुरक्षित बाहेर आलेल्या २१९ भारतीय यांना घेऊन एअर इंडियाचे विमान मुंबईला रवाना झाले आहे, असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या टीम अथक प्रयत्न करत आहेत. आपण स्वतः सर्व परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत, असे जयशंकर यांनी सांगितले. हे विमान दुपारी ४ वाजेपर्यंत मुंबईत दाखल होईल, असं सांगण्यात येत आहे.
युक्रेनमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी संपूर्ण भारत सरकार रात्रं-दिवस काम करत आहे. शेवटच्या नागरिकाला सुखरुप आणत नाही तोपर्यंत मोहीम पूर्ण होणार नाही. आपल्या जीवनातील आजचा दिवस लक्षात ठेवा…, असं रोमानियातील भारताचे राजदूत राहुल श्रीवास्तव म्हणाले.


