Sunday, August 16, 2026
Homeअर्थविश्व'रुपी'च्या ठेवीदारांना लवकरच पैसे मिळणार!; सीतारामन यांनी दिली ग्वाही

‘रुपी’च्या ठेवीदारांना लवकरच पैसे मिळणार!; सीतारामन यांनी दिली ग्वाही

१० ऑगस्ट २०२१,
रुपी बँकेतील ठेवीदारांना त्यांचे मुदत ठेवीचे पैसे लवकरच परत मिळतील, अशी ग्वाही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत दिली. पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.लोकसभेतील चर्चेपूर्वी आपण सीतारामन यांची आज सकाळी भेट घेऊन याच विषयावर चर्चा केली होती याकडे लक्ष वेधून बापट म्हणाले की, पीएमसी व गुरू राघवेन्द्र बँक यासारख्या लहान बँकांतील ठेवीदारांनाही पैसे परत मिळतील, असेही अर्थमंत्र्यांनी लोकसभेत आज स्पष्ट केले.

” डिपॉझिट इन्शुरन्स क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ॲक्ट ” हे विधेयक सोमवारी लोकसभेत मंजूर झाले. त्यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना अर्थमंत्री सीतारामन यांनी रुपी बँक व यासारख्या लहान बँकांतील ठेवीदारांना पाच लाखापर्यंतच्या ठेवींचे पैसे नव्वद दिवसात परत मिळतील, असे आश्वासन त्यांनी दिले. काही छोट्या सहकारी बँका आर्थिकदृष्ट्या अडचणीत आल्या आहेत. त्यातील ठेवीदारांना मुदत ठेवीचे पैसे परत मिळत नाहीत. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक आहे. त्यांचा या विधेयकामुळे फायदा होईल, असेही सीतारामन यांनी नमूद केले.

मी विलीनीकरणाचा मुद्दाही सीतारामन यांच्याकडे मांडला होता. त्यावर प्रशासकीय अधिकाऱ्यांशी येत्या दोनतीन दिवसांत चर्चा करून विलीनीकरणाचा प्रश्न मार्गी लावण्याचा आपण प्रयत्न करू, असे आश्वासन सीतारामन यांनी दिल्याचे बापट यांनी सांगितले. बापट पुढे म्हणाले की, गेली आठ वर्षे रुपी बँक विलीनीकरणाच्या फेऱ्यात अडकली आहे. त्यामुळे बँकेच्या अनेक ठेवीदारांच्या समोर आर्थिक अडचण उभी राहिली आहे. याबाबत अर्थ मंत्रालय व रिझर्व्ह बँकेने धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी मी निर्मला सीतारामन यांच्याकडे आज केली. बँकेच्या प्रशासकीय मंडळाने विलीनीकरणाचा प्रस्ताव पाठवला असून त्याला आपण मंजुरी द्यावी, अशी विनंतीही मी केली. गेल्या आठ वर्षात या बँकेने ३०० कोटी रुपयांचे कर्ज वसूल केले असून सुमारे १३०० कोटी रुपयांच्या ठेवी बँकेकडे आहेत. लघु वित्तीय बँकेत रूपांतर करण्यासही आमची हरकत नाही. ते शक्य नसल्यास रिझर्व्ह बँकेने रुपी बँकेला पुन्हा बँकिंग परवाना द्यावा, अशी मागणी आपण केली. बँकेतील ९९ टक्के ठेवीदारांच्या सातशे वीस कोटी रुपयांच्या ठेवी पाच लाखांच्या आतील आहेत व पाच लाखावरील ठेवी असलेल्या ठेवीदारांची संख्या ४ हजार आहे. अशा परिस्थितीत बँकेला परवाना मिळाल्यास ठेवीदारांचे पैसे मिळतील, असे सीतारामन यांना सांगितल्याचेही बापट यांनी नमूद केले.

बँकेची आर्थिक स्थिती सुधारल्याने बँकेचे बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विलीनीकरण करणे योग्य ठरेल. त्याचा बँक ऑफ महाराष्ट्रच्या आर्थिक स्थितीवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. उलट बँक ऑफ महाराष्ट्रचा व्यावसायिक लाभ होईल, असा दावा मी सीतारामन यांच्याकडे केला. दोन्ही बँकांची मध्यवर्ती कार्यालये पुण्यातच आहेत त्यांचा ग्राहक वर्ग आणि कार्यपद्धती परस्परांना पूरक आहे. म्हणून आपण रुपी बँकेचा प्रश्न मार्गी लावावा अशी विनंती सीतारामन यांच्याकडे केल्याचे बापट पुढे म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments