२५ नोव्हेंबर २०२०
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं आज पहाटे निधन झालं. त्याच्या निधनामुळे काँग्रेस नेत्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांकडूनही पटेल यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पटेल यांच्या स्वभावाचे पैलू उलगड श्रद्धांजली वाहिली आहे.
अहमद पटेल यांच्याविषयी राज ठाकरे यांनी ट्विट करून भावना व्यक्त केल्या आहेत. “काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं कोरोनाने निधन झालं. अहमद पटेल कमालीचे चाणाक्ष, बुद्धिमान नेते होते. राजकारणाला बुद्धिबळाच्या पटावर ठेवून डाव-प्रतिडाव खेळण्यात ते माहीर होते, पण ही असाधारण क्षमता त्यांनी राजकीय लढाया जिंकण्यापुरतीच वापरली, तिला कधी त्यांनी व्यक्तिगत हेवेदावे ह्यासाठी वापरलं नाही. त्यामुळेच या खंडप्राय देशाच्या कानाकोपऱ्यातील सर्वपक्षीय राजकीय नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते,” असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
“राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांचा एखाद्याशी स्नेह तयार झाला की, त्या व्यक्तीच्या व्यक्तिगत आयुष्यातील सुखदुःखांच्या प्रसंगात ते ठाम उभे राहत याचा अनुभव मी देखील घेतला आहे. ४३ वर्ष सक्रिय राजकारणात राहून, आणि अहमद पटेल यांचं निवासस्थान अनेक सत्तांतराचं केंद्रस्थान होऊन देखील स्वतः सत्तेच्या पदांच्या मोहात न पडणं हा गुण दुर्मिळच. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अहमद पटेल ह्यांना विनम्र श्रद्धांजली,” अशा भावना राज ठाकरे यांनी व्यक्त केल्या आहेत.