कोरोना महामारीमुळे लॉकडाउन लागले आणि कंपन्यांचे काम ठप्प झाल्याने लाखो तरुणांच्या नोकऱ्या गेल्या. अश्याचप्रकारे नोकरी गेल्याच्या नैराश्यातून एका इंजिनिअर तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पुण्यातील कोंढवा भागात राहणाऱ्या ऋषिकेश मारुती उमाप असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. कावेरी पार्क सोसायटी कोंढवा येथे हा तरुण राहत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा परिसरातील कावेरी पार्क सोसायटीमध्ये ऋषिकेश मारुती उमाप हा तरूण कुटुंबासोबत राहत होता. इंजिनिअर असलेला ऋषिकेशची लॉकडाउनमध्ये नोकरी गेली. त्यामुळे तो घरीच बसून होता. नोकरी नसल्याने, तो कायम चिंतेत होता.
दरम्यान, ऋषिकेश नेहमी प्रमाणे सोमवारी रात्री त्याच्या रूममध्ये झोपण्यास गेला. मात्र सकाळी बराच वेळ होऊन देखील बाहेर आला नाही. त्यामुळे त्याच्या रूममधील खिडकीतून घरातील व्यक्तीनी पाहिले असता ऋषिकेशने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणाचा अधिक तपास कोंढवा पोलीस करीत आहे.