पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासाचे शिल्पकार, आमचे प्रेरणास्थान आणि मार्गदर्शक, लोकनेते आदरणीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या शक्तीस्थळाचे लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत पिंपळे गुरव येथे संपन्न झाले. हा क्षण केवळ एक कार्यक्रम नसून, पिंपरी-चिंचवडच्या विकासयात्रेतील भावनिक आणि ऐतिहासिक पर्व ठरला.
यावेळी मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी बोलताना सांगितले की, पिंपरी-चिंचवडमध्ये आल्यानंतर लक्ष्मणभाऊंची आठवण आल्याशिवाय राहत नाही. शहरात त्यांनी उभ्या केलेल्या चिरस्थायी कार्याची साक्ष देणारे हे शक्तीस्थळ कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा देणारे केंद्र ठरेल. तसेच, औद्योगिकीकरणामुळे वेगाने विस्तारत असलेल्या शहराला अत्याधुनिकतेकडे नेण्यासाठी लक्ष्मणभाऊंनी राज्य सरकार आणि महापालिकेचा समन्वय साधत दूरदृष्टीपूर्ण विकासाचे व्हिजन प्रत्यक्षात उतरवले असल्याचे त्यांनी नमूद केले.
यासोबतच लक्ष्मणभाऊ जगताप हे केवळ निवडणुका जिंकणारे नेते नव्हते, तर मन जिंकणारे नेतृत्व होते. सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन घडवण्याचे काम त्यांच्या माध्यमातून झाले. पिंपरी-चिंचवड शहराला रस्ते, पाणीपुरवठा, सार्वजनिक वाहतूक, आरोग्य, शिक्षण आणि औद्योगिक विकासाचा ठोस चेहरा मिळाला. ‘मिनी महाराष्ट्र’ म्हणून ओळख निर्माण होत असताना, या शहराला सर्वंकष विकासाचा नवा आयाम देण्याचे श्रेय त्यांनाच जाते.
यासोबतच मा. देवेंद्रजींनी लक्ष्मणभाऊंच्या व्यक्तिमत्त्वातील आध्यात्मिक बैठक, वारकरी संप्रदायाशी असलेले नाते, मातीशी जोडलेली नाळ तसेच त्यांची शिस्तबद्ध व लढवय्यी वृत्ती यांचा उल्लेख केला. उड्डाणपूल, स्मार्टसिटी, कचऱ्यापासून वीज निर्मिती, २४x७ पाणीपुरवठ्यासाठी अमृत योजना, नदी सुधार प्रकल्प, पायाभूत सुविधा अशा अनेक योजना कायम त्यांच्या कार्याची आठवण करून देत राहतील, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी लक्ष्मणभाऊंच्या कार्याचा जीवनपट उलगडत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. खरंतर आदरणीय भाऊंच्या अकाली जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. मात्र, त्यांनी दाखवलेली विकासाची दिशा, सेवा आणि संघर्षाची शिकवण हेच आपले भांडवल आहे. आज लोकार्पण झालेले हे शक्तीस्थळ पिंपरी-चिंचवडच्या प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रत्येक नागरिकाला सातत्याने प्रेरणा देत राहील. लक्ष्मणभाऊंचा वसा आणि वारसा पुढे नेत, त्यांच्या स्वप्नातील शहर साकार करण्याची जबाबदारी आपण सर्वांनी एकत्रितपणे पार पाडायची आहे, असा विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त केला.
या कार्यक्रमास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा.श्री. चंद्रकांतदादा पाटील, माजी मंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत, माजी आमदार अश्विनीताई जगताप, आमदार श्री. महेशदादा लांडगे, आमदार श्री. बापूसाहेब पठारे, विधान परिषदेचे आमदार श्री. अमित गोरखे, आमदार उमाताई खापरे, शहराध्यक्ष श्री. शत्रुघ्न काटे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


