युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यात होणाऱ्या दिरंगाईच्या मुद्द्यावरून शिवसेनेने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला लक्ष्य केले आहे. यापूर्वी भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये सुटकेसाठी आक्रोश करत होते तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीच्या प्रचारसभेत गंगाकिनारी डमरू वाजवत होते. हेच जर कोणाला ऑपरेशन गंगा वाटते असेल तर तुम्हाला कोपरापासून साष्टांग दंडवत, असा टोला शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून लगावण्यात आला आहे. तसेच ‘ऑपरेशन गंगा’चा खुळखुळा वाजवणे थांबवा. थोड्या काळासाठी राजकारण बाजूला ठेवा. सुमी आणि रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सोडवून आणण्यास प्राथमिकता द्या, असा सल्ला शिवसेनेने केंद्र सरकारला दिला आहे.
तसेच ‘ऑपरेशन गंगा’च्या माध्यमातून सुरु असणाऱ्या राजकीय प्रचारावरही शिवसेनेने टीका केली आहे. भारतीय विद्यार्थ्यांना विमानात चढवल्यानंतर त्यांच्याकडून मोदी झिंदाबादचे नारे लगावून घेण्यात आले. ‘ऑपरेशन गंगा’ला राजकीय प्रचाराचे खेळणे बनवले आहे. युक्रेनच्या शहरांमध्ये अडकलेले भारतीय विद्यार्थी शेकडो मैलांची पायपीट करत शेजारच्या देशांमध्ये पोहोचले. जे घडले त्यास विद्यार्थ्यांची सुटका म्हणता येणार नाही. पण भाजपच्या आयटी सेल्सचे ‘गोबेल्स’ या भारतीय विद्यार्थ्यांची दिशाभूल करत होते. विद्यार्थ्यांनी हाती तिरंगा घेऊन बाहेर पडावे, त्यांना कोणीही हात लावणार नाही, इथपासून ते मोदी-पुतिन यांच्यात चर्चा झाली असून सहा तासांसाठी युद्धविराम करण्यात आल्याच्या बातम्या पसरवण्यात आल्या. हा सर्व त्या मुलांच्या जीवाशी खेळ होता, अशी टीका ‘सामना’तून करण्यात आली आहे.
आजही सुमी शहरात शेकडो विद्यार्थी अडकून पडले आहेत व त्यांचे अन्न-पाण्याशिवाय हाल सुरू आहेत. त्यांना घराबाहेर पडता येत नाही. त्यांची सुटका करून ऑपरेशन गंगाचे कर्तृत्व दाखवायची संधी आहे. रशियातही हजारो भारतीय मुले अडकून पडली आहेत. मोदी यांनी पुतीन यांच्याशी प्रेमपूर्वक वार्तालाप करून मुलांना मदत करावी, असेही शिवसेनेने म्हटले आहे.


