पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात विदर्भातील शिवसेना नेते संजय राठोड यांना मंत्रिपद गमवावे लागले. त्यामुळे रिक्त जागेवर निवड करण्यासाठी आता आणखी दुसऱ्या बंजारा समाजातील नेत्याने शिवसेना नेत्याकडे पत्र पाठवले आहे. शिवसेनेचे नेते हरीभाऊ राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून संजय राठोड यांच्याजागी मला वनमंत्री पद द्या अशी मागणी केली आहे.
हरीभाऊ राठोड यांनी मुख्यमंत्र्यांना ७ मार्च रोजी पहिलं पत्र लिहिलं आहे. तर दुसरं पत्र ११ मार्चला पाठवलं आहे. हरीभाऊ राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे भेटीसाठी दहा मिनिटांचा वेळ मागितला आहे. संजय राठोड यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या वनमंत्री पदी बंजारा समाजाचे नेते म्हणून आपल्याला संधी द्यावी अशी मागणी या पत्रामध्ये हरीभाऊंनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. “वंचित घटकाला मुख्यमंत्री नक्की न्याय देतील असा मला विश्वास आहे. तसेच संधी मिळाल्यास आपण विदर्भामध्ये शिवसेनेला पहिल्या क्रमांकाचा पक्ष करण्याचा प्रयत्न करु. याचसंदर्भात राजकीय चर्चा करण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागितला असून ते नक्की वेळ देतील,” अशी प्रतिक्रिया हरीभाऊ राठोड यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केली.
“तुम्हाला मुख्यमंत्री करण्यासाठी मी स्वत:ची आमदारकी पणाला लावली. अन्यथा मला काँग्रेसच्या कोट्यातून सहज मंत्रिपद मिळाले असते. त्यामुळे आता वनमंत्रीपद मला द्यावे,” असं हरीभाऊ यांनी पत्रात म्हटलं आहे. शिवसेनेमध्ये बिनशर्त प्रवेश केल्याची आठवण करुन देत, सत्तेत आल्यास खारीचा वाटा देऊ असं उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याचंही हरीभाऊ यांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे.
पोहरा देवाच्या महंतांचा हरिभाऊ राठोड यांना पाठिंबा
पोहरा देवाची महंत सुनील महाराज यांनी हरीभाऊ राठोड यांना संजय राठोड यांच्या जागी वनमंत्री पद दिलं जाणार असेल तर या निर्णयाचं आम्ही बंजारा समाजाच्या वतीने स्वागत करतो असं म्हटलं आहे. हरीभाऊ हे ७२-७३ वर्षांचे नेते आहेत. त्यामुळे समाजातील नेते म्हणून आमचा त्यांना पाठिंबा असेल. देशामध्ये बंजारा समाजाचे १२ कोटी लोकं असल्याने या सामाजातील नेत्यांना संधी दिली पाहिजे, असं मत सुनील महाराज यांनी व्यक्त केलं आहे.