राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणावरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात वाद निर्माण झाला होता. यावेळी बोलताना फडणवीसांनी अन्वय नाईक प्रकरण दाबलं असा आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. यानंतर फडणवीसांनी सुप्रीम कोर्टाचा दाखला देत गृहमंत्र्यांविरोधात हक्कभंग दाखल केला आहे. या सर्व घडामोडींदरम्यान अन्वय नाईक कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेत विरोधी पक्षाकडून दिशाभूल केली जात असल्याचा आरोप केला आहे.
फक्त श्रीमंतानाच न्याय मिळणार का? अशी विचारणा अन्वय नाईक यांची मुलगी आज्ञा नाईकने केली. “सुप्रीम कोर्टाने निकाल नाही तर फक्त जामीन दिला आहे. लोकांची दिशाभूल करण्यात येत असून आमचा लढा अद्याप सुरु आहे,” असं सांगत यावेळी त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला, तसंच मुंबई पोलिसांच्या तोंडाला काळं फासलं असं म्हणणं योग्य वाटतं का? अशीदेखील विचारणा केली.
“आम्हाला ज्या धमक्या येत आहेत त्याचं काहीच नाही का? आम्हाला अद्यापही धमक्या दिल्या जात आहेत. अर्णब गोस्वामी जेलमधून बाहेर पडल्यावर सर्वांसमोर धमकी देत होता, आम्हाला दोन दिवस झोप लागली नाही,” असं त्या म्हणाल्या. आमची केस दाबली गेली असून त्याची चौकशी करावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली.
“आमच्यावर हात टाकण्यात आला होता. तेव्हाच्या तपास अधिकाऱ्याला कोणाचा आदेश होता हेदेखील बाहेर काढावं. मी आणि आई मनाचं काही सांगत नाही आहोत. आम्ही संशय व्यक्त करत नसून सुसाईड नोटमध्ये नाव देण्यात आलं आहे. तपास अधिकाऱ्याला आमची चौकशी करण्याचा आदेश कोणी दिला होता? ज्यांना समस्या आहे त्यांनी चर्चेला बसावं. चाय पे चर्चा होऊन जाऊ द्या,” असं आव्हान यावेळी आज्ञा नाईकने दिलं. तसंच किरीट सोमय्यांचा जीव वर खाली का होतो? असा सवाल विचारला.
अक्षता नाईक आणि आज्ञा नाईक यांनी यावेळी महाराष्ट्र पोलिसांचा आपल्याला अभिमान असल्याचं सांगितलं. तसंच गरज लागल्यास मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ अशी माहिती दिली.