विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी मतपत्रिकेद्वारे मतदान करता यावे म्हणून कायदा करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मतपत्रिकेशिवाय आणखी काही आधुनिक पर्याय असेल तर त्याचाही विचार केला पाहिजे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अजित पवार यांनी तिसऱ्या पर्यायाची भूमिका मांडली आहे. मतपत्रिकेने मतदान करण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घेतला आहे. त्यावर अजितदादांना त्यांची भूमिका विचारण्यात आली. ते विधानसभेचे अध्यक्ष आहेत. काय सूचना करावी हा त्यांचा अधिकार आहे. त्यांनी जरी सरकारला सांगितले असले तरी मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळ त्यावर चर्चा करेल आणि पुढे कसे जायचे ते ठरवतील. मंत्रीमंडळाने घेतलेला निर्णय अंतिम असेल असे सांगतानाच मशीनने पेपरलेस काम होते म्हणून तो पर्याय आला. परंतु देशाच्या लोकसभेच्या, विधानसभेच्या निवडणुका मशीनद्वारे होतात. इतर निवडणुकाही मशीनद्वारे होतात. मात्र त्यात कुणाला शंका वाटत असेल, त्रुटी राहिलेली दिसत असेल, नवीन तंत्रज्ञान आलेले असेल आणि त्यातून पारदर्शकता निर्माण करता येत असेल तर त्याचा विचार झाला पाहिजे, असं अजित पवार म्हणाले.