अयोध्या येथे १३ ते १६ एप्रिल या कालावधीत होणाऱ्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी शुक्रवारी जाहीर करण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या संघातून गुरुवारी कोरोना अहवाल सकारात्मक आलेल्या तिन्ही खेळाडूंना वगळण्यात आले आहे.
‘‘बारामतीच्या शासकीय आरोग्य केंद्रात झालेल्या कोरोना चाचणीचा अहवाल सकारात्मक आल्यामुळे या तीन खेळाडूंना संघात स्थान न देण्याचा कठीण निर्णय घ्यावा लागला. कारण हे खेळाडू राज्यातील उत्तम बचावपटू होते. याचप्रमाणे शनिवार-रविवारी राज्यात टाळेबंदी असल्यामुळे शुक्रवारीच प्रवेशिका भरून संघनिवड करण्यात आली आहे,’’ अशी माहिती राज्य कबड्डी संघटनेचे सरकार्यवाह अॅड. आस्वाद पाटील यांनी दिली.
प्रो कबड्डीमधील तारांकित कबड्डीपटू सिद्धार्थ देसाई गतवर्षी महाराष्ट्र आणि रेल्वे या दोन्ही संघांकडून खेळण्यात अपयशी ठरला होता. यंदा रेल्वेने ना हरकत प्रमाणपत्र दिल्यामुळे तो महाराष्ट्राकडून खेळू शकणार आहे. याशिवाय रिशांक देवाडिगा, गिरीश इर्नाक, नीलेश साळुंखे या प्रो कबड्डी गाजवणाऱ्या खेळाडूंचाही संघात समावेश आहे.
महाराष्ट्राचा संघ :
कर्णधार : शुभम शिंदे, अजिंक्य पवार (रत्नागिरी), पंकज मोहिते, सुशांत साईल (मुंबई शहर), सुनील दुबिले, सिद्धार्थ देसाई (नांदेड), सुधाकर कदम (पुणे), गिरीश इरनाक, निलेश साळुंखे (ठाणे), रिशांक देवडिगा (उपनगर), मयूर कदम (रायगड), दादासाहेब आव्हाड (नंदुरबार); प्रशिक्षक : प्रशांत सुर्वे, व्यवस्थापक : बजरंग परदेशी.