“कुटुंब सांभाळू शकत नाही तो व्यक्ती महाराष्ट्र व कोरोनाबाधित रूग्णांना कसं सांभाळणार? हे अपयश आहे. कोरोना हाताळायला हे सरकार कमी पडलं आहे,” असे म्हणत भाजपा नेते नारायण राणे यांनी आज पत्रकारपरिषदेत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.
नारायण राणे म्हणाले, “महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग मोठ्याप्रमाणावर वाढत आहे. कोरोना संसर्ग वाढत असताना, त्यावर उपाययोजना करायला हा महाराष्ट्र कमी पडला आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत रूग्णांची संख्या वाढत आहे, मृत्यूंची संख्या वाढत आहे. याचं गांभीर्य राज्य सरकारला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे हे केंद्राकडे बोट दाखवत आहेत. राज्यात डॉक्टर्स नाही, बेड्स नाही, नर्स नाही ही कोणाची जबाबदारी आहे? जसं माझं कुटुंबं माझी जबाबदारी, तर महाराष्ट्र तुमचं कुटुंबं असेल, तर या सर्व गोष्टी उपलब्ध करणं. रूग्णांवर उपचार योग्यप्रकारे करणं, त्यांना बरं करणं ही तुमची तुमची जबाबदारी नाही का ? पिंजऱ्यात काय जाऊन बसत आहात, स्वतःला लॉकडाउन करून घेतलं आहे. मातोश्रीच्या बाहेर पडत नाही मग कोरोना होईल कसा? माझे कुटुंब माझी जबाबदारी असताना कुटुंबातील सगळी लोकं, रूग्णालयात कसे? म्हणजे कुटुंब सांभाळू शकत नाही तो व्यक्ती महाराष्ट्र व कोरोनाबाधित रूग्णांना कसं सांभाळणार? हे अपयश आहे. कोरोना हाताळायला हे सरकार कमी पडलं आहे. केंद्राकडे का बोट दाखवता?”
तसेच सचिन वाझे, अनिल देशमुख यांच्यावरूनही राणे यांनी टीकास्त्र सोडले. “माझा प्रश्न आहे सचिन वाझेला मुंबईतून १०० कोटी जमा करायला सांगितले, हे आदेश केवळ अनिल देशमुख यांचे नाहीत. यामध्ये सगळे राज्याचे प्रमुख सहभागी आहेत. मग तुम्ही जमा केलेले पैसे, लसीसाठी का नाही वापरत? ते कुठे जातात? कोणाकडे जातात? याबद्दल काहीतरी सांगा. मग बेड नाही व्हेंटिलेटर्स नाहीत असं सांगितलं जातं. वॉर्ड बॉय, नर्स, डॉक्टर्स यांची भरती कोणी करायची?” असा सवाल देखील राणेंनी यावेळी उपस्थित केला.