मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची चर्चा सुरू होती. यात अनेक नाव आघाडीवर होती. अखेर प्रदेशाध्यपदी काँग्रेस नाना पटोले यांची नियुक्ती करत तर्कविर्तकांना पूर्णविराम दिला आहे. पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्याचं नावं प्रदेशाध्यपदासाठी निश्चित झाल्याचं मानलं जात होतं.
२०१४ साली भंडारा-गोंदिया मतदारसंघातून नाना पटोले यांनी भाजपाच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक जिंकली. पण पाच वर्षाच्या आताच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यपद्धतीवर टीका करत पुन्हा त्यांनी काँग्रेसमध्ये घरवापसी केली होती. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून लढत त्यांनी विजय संपादित केला. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार आले. महाआघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
नाना पटोले यांच्याबरोबर त्यांच्या मदतीला सहा कार्यकारी अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात शिवाजीराव मोघे, बसवराज पाटील, मोहमद आरिफ नासीम खान, कुणाल पाटील, चंद्रकांत हंडोरे, प्रणिती शिंदे यांच्यावर नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर प्रदेश उपाध्यक्षपदी शिरीष चौधरी, रमेश बागवे, हुसैन दलवाई, मोहन जोशी, रणजित कांबळे, कैलास गोरंट्याल, बी. आय. नगराळे, शरद अहेर, एम.एम. शेख आणि माणिक जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे.