देशात सध्या लसीकरण सुरु असून महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. पण राज्यात सध्या तीन दिवस पुरेल इतकेच लसीचे डोस शिल्लक असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी केंद्राकडे लसींचा पुरवठा कऱण्याची मागणी केली आहे.
“सहा लाखांच टार्गेट पूर्ण करायचं असेल तर लोकांनीही सहकार्य करणं आवश्यक आहे. गावागावात न घाबरता लसीकरण झालं पाहिजे. अनेकांमध्ये गैरसमज असून, काहीजण पसरवत आहे. मुस्लीमांमधील गैरसमज दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आहेत. मुस्लीम धर्मगुरू व राजकीय नेत्यांना आम्ही समजावण्याचा प्रयत्न केला आहे. मुस्लीमांमध्ये लसीकरणाचा दर कमी असून तो वाढवला पाहिजे. ते चांगला प्रतिसाद देत आहेत. मुस्लीमांमध्ये असलेले गैरसमज दूर होतील व ते ही लसीकरणाला प्रतिसाद देतील ही आशा आहे.
तसेच राजेश टोपे म्हणाले की, “महाराष्ट्रात लसीचे १४ लाख डोस शिल्लक असून ही तीन दिवसांपुरता साठा आहे. पाच लाखांच्या तुलनेत हे डोस तीन दिवसांत संपेल आणि महाराष्ट्रातील लसीकरण बंद होऊ शकेल. म्हणूनच दर आठवड्याला किमान ४० लाख लस पुरवठा केला पाहिजे. आज आम्ही साडे चार ते पाच लाखांपर्यंत आहोत. पण दोन दिवसांत दिवसाला सहा लाखांपर्यंत जाण्याची हमी मी देतो,” असंही ते म्हणाले.