महाराष्ट्रासह काही राज्यातील कोरोना परिस्थिती गंभीर होत असल्याने केंद्र सरकारकडून तीन राज्यात तज्ज्ञांची ५० पथकं तैनात करण्यात आली आहेत. यात महाराष्ट्रासाठी चिंतेची बाब म्हणजे देशातील एकूण रुग्णसंख्येपैकी ५८ टक्के रुग्ण महाराष्ट्रातील आहे. तर मृत्यूचीही संख्याही मोठी आहे.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्रकार परिषदेत देशातील कोरोना परिस्थितीची माहिती दिली. केंद्रीय आरोग्य सचिव भूषण म्हणाले, “देशात सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या असलेल्या पहिला दहा जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांचा समावेश आहे. एक जिल्हा कर्नाटकातील आहे. तर छत्तीसगढ आणि दिल्लीतीलही एका जिल्ह्याचा टॉप टेनमध्ये समावेश आहे,” अशी माहिती भूषण यांनी दिली.
“पंजाब आणि छत्तीसगढमध्ये वाढती मृत्यूसंख्या चिंतेची बाब आहे. देशातील एकूण रुग्णसंख्येपैकी ५८ टक्के उपचार घेत असलेले रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. तर मृत्यूचं प्रमाण ३४ टक्के आहे. महाराष्ट्रात गेल्या काही आठवड्यांपासून आरटी-पीसीआर चाचण्या घटल्या आहेत. आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्र सरकारला आरटी-पीसीआर चाचण्या वाढवण्याचा सल्ला दिला आहे. सध्या फक्त ६० टक्के आरटी-पीसीआर चाचण्या महाराष्ट्रात होत असून, त्या ७० टक्क्यांच्या पुढे घेऊन जाण्याचं राज्य सरकारला सांगण्यात आलं आहे,” असं भूषण यांनी सांगितलं.