जून महिना सुरु व्हायची सगळेच जण आतुरतेने वाट पाहात असतात. सर्वात पहिला पाऊस आला की, बेत सुरु होतात ते पावसात कुठे कुठे फिरायला जायचंय. अगदी पावसातील वन – डे पिकनिकपासून ते पावसातील ट्रीपपर्यंत अनेक योजना आपण बनवत असतो आणि पावसाची मजा घ्यायला जायचं तर भारताइतकं सुंदर ठिकाण अजून कोणतं असणार. पाऊस म्हटलं की, पाण्याने भरभरून वाहणारे धबधबे आणि निसर्गाच्या सान्निध्यातील डोळ्याला भावणारा हिरवागार झाडांचा नजारा. या दोन गोष्टींनीच मन भरून जातं आणि त्यावर अशा निसर्गाच्या सान्निध्यात पावसाच्या गार वाऱ्यात आणि पाण्यात आपल्या माणसाची साथ हे समीकरण असलं की, ट्रीप अगदी यशस्वी होते आणि आपणही खूप फ्रेश होतो. आम्ही तुम्हाला पावसाळ्यात फिरायला जाण्यासाठी काही खास ठिकाणं सांगणार आहोत. या पावसाळ्यात भरा आपल्या बॅग्ज आणि निघा आपल्या जोडीदाराबरोबर पावसाळ्यात फिरायला…
पावसाळ्यात फिरण्यासाठी कुठे कुठे जायचं :
1.रायगड (Raigad) -किल्ले रायगड म्हटलं की, असंही डोळ्यासमोर सर्व काही भव्यदिव्य दिसतं. पण पावसाळ्यात रायगडवर जाण्याची आणि पावसाचा आनंद लुटण्याची मजा काही औरच आहे. हिरवाईने नटलेला रायगड किल्ला अतिशय सुंदर दिसतो. इतकंच नाही तर ठिकठिकाणी पाणी जमून रायगड किल्ल्याची शोभा अधिक वाढते. पावसात या ठिकाणी ट्रेकिंग करणं तसं कठीण आहे. पण अनेक ट्रेकर्स पाऊस सुरु झाल्यावर नक्कीच एकदा तरी इथे ट्रेकिंगला येतात. पण तुम्हाला ट्रेकिंग जमत नसेल तर इथे रोप-वे ची देखील सोय आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींचा ग्रुप करून इथे खूप मस्त मजामस्ती करू शकता. रायगडावरून खाली पाहिल्यानंतर तर तुम्हाला खूपच ताजंतवानं व्हायला होतं. इथे पाऊल ठेवल्यावर एक वेगळाच उत्साह जाणवतो हे नक्की.
कोणासाठी – इतिहासप्रेमी, निसर्गप्रेमी
काय करता येतं – ट्रेकिंग, इतिहासाचा अभ्यास, साईटसीन, कँपिंग
कसं पोहचता येतं – गाडीने जाता येतं अथवा रायगडपर्यंत एस.टी. ची देखील सोय आहे
- अलिबाग (Alibaug) -अलिबाग हे प्रत्येक ऋतूमध्ये फिरायला जाण्याचं खरं तर ठिकाण आहे. पण पावसाळ्यात इथे जास्त मजा येते. समुद्रकिनाऱ्यावर वाहणारी हवा आणि पावसामध्ये भिजण्याचा आनंद काही वेगळाच. कोकणातील हा भाग पावसाळ्यात खूपच सुंदर दिसतो. तुम्हाला समुद्रकिनारी पावसात भिजायला आवडत असेल तर अलिबाग हा उत्तम पर्याय आहे. तसंच इथलं सी – फूडही पावसाळ्यात खास तुम्ही खाऊ शकता.
कोणासाठी – इतिहासप्रेमी, निसर्गप्रेमी, समुद्रप्रेमी
काय करता येतं – साईटसीन, कँपिंग, जेट स्काईंग, बनाना स्काईंग, हॉर्स राईड
कसं पोहचता येतं – गाडीने जाता येतं अथवा अलिबागपर्यंत एस.टी. ची देखील सोय आहे. पावसाळ्याशिवाय जायचं असल्यास, गेट वे ऑफ इंडियावरून बोटीने प्रवास करता येतो.
आकर्षण – कुलाबा फोर्ट, अलिबाग बीच, मुरुड बीच, खंदारी, रेवस बीच, नागाव बीच, बिर्ला मंदीर
- लोणावळा (Lonavala)-मुंबईपासून साधारण दोन तासांच्या अंतरावर असलेलं लोणावळा हे पावसाळ्यामध्ये फिरण्यासाठी प्रसिद्ध स्थळ आहे. पटकन जाऊन पटकन येता येत असल्यामुळे लोणावळ्याला जाणं बरेच लोक पसंत करतात. मुळात सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं लोणावळा हे पावसाच्या दिवसात अप्रतिम सौंदर्याने नटतं आणि त्यामुळेच इथे गेल्यानंतर सगळा थकवा निघून जातो. अगदी खालपर्यंत येणारे ढग तुम्हाला अधिक आकर्षित करतात. डोंगर, दऱ्या आणि धबधबे या सगळ्याचं एकत्रित मिश्रण म्हणजे लोणावळा. शिवाय इथे जाण्यासाठी तुम्हाला जास्त कोणत्याही योजना बनवाव्या लागत नाहीत. अचानक प्लॅन ठरला तरी पटकन इथे जाता येतं.
कोणासाठी – निसर्गप्रेमी
काय करता येतं – साईटसीन, कँपिंग, हॉर्स राईड, ट्रेकिंग
कसं पोहचता येतं – गाडीने जाता येतं अथवा अनेक बसचीदेखील सोय आहे. पटकन पोहचायचं असल्यास, ट्रेन अर्थात एक्स्प्रेस हा उत्तम पर्याय आहे. अगदी परवड्याजोगी पिकनिक होते.
आकर्षण – टायगर पॉईंट, कार्ला लेणी, बुशी डॅम
- गोवा (Goa)-खरं तर लोकांना असं वाटतं की, गोव्याला केवळ थंडी अथवा उन्हाळ्यात मजा येते. पण गोव्याचा भाग हा समुद्रकिनाऱ्यांनी नटलेला असल्यामुळे पावसाळ्यात याचं सौंदर्य काही वेगळंच भासतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पावसाळ्यात इथे तुम्हाला कमी पैशांमध्ये राहण्याची सोय मिळते. तसंच तुम्ही मांसाहारी असल्यास, तुम्हाला पावसाळी मासे इथे मुबलक प्रमाणात मिळतात. गोव्याचे किनारे यावेळी खूपच सुंदर दिसतात. तुम्हाला रोमँटिक पावसाळा हवा असेल तर गोव्यासारखं दुसरं उत्तम ठिकाण नाही. पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो हे जरी मान्य केलं तर त्याचं हे रूप बघायलाही तितकंच छान गोव्याला वाटतं. खास भिजायला तुम्ही पावसाळ्यात गोव्याला जाऊ शकता. अगदी स्वस्तात मस्त अशी तुमची गोव्याची ट्रीप पावसाळ्यात होऊ शकते.
कोणासाठी – निसर्गप्रेमी, समुद्रप्रेमी, साहसप्रेमी, पार्टी लव्हर्स
काय करता येतं – साईटसीन, जेट स्काईंग,स्कुबा, हेरिटेज टूर, बर्डवॉचिंग
कसं पोहचता येतं – गाडीने जाता येतं अथवा बस उपलब्ध आहेत. ट्रेननेदेखील मडगावपर्यंत जाऊन पुढे गाडीने गोव्याला जाता येतं. तसंच तुम्हाला पटकन पोहचायचं असल्यास, विमान हादेखील पर्याय उपलब्ध आहे.
आकर्षण – दुधसागर धबधबा, अगोडा फोर्ट, डॉल्फिन शो, क्रुझ, विविध समुद्रकिनारे, बागा बीचवरील वॉटर स्पोर्ट्स
- कोडाईकनाल (Kodaikanal)-कोडाईकनाल तामिळनाडूमध्ये असून ‘प्रिन्सेस ऑफ हिल स्टेशन’ म्हणून प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात फिरण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे. संपूर्ण हिरवळीने नटलेलं हे हिल स्टेशन डोळ्याला खूपच आनंद मिळवून देतं. सुंदर धबधबे, तलाव आणि ठिकठिकाणची हिरवळ कोडाईकनालचं आकर्षण आहे. खरं तर इथे गेल्यानंतर स्वर्गात आल्यासारखंच वाटतं. कारण पावसाळ्यात सतत इथे ढग उतरत असतात आणि पाऊस आणि थंडीचं एक वेगळंच संमिश्रण कोडाईकनालमध्ये तुम्हाला अनुभवायला मिळतं.
कोणासाठी – निसर्गप्रेमी
काय करता येतं – बोटिंग, साईटसीन, ट्रेकिंग
कसं पोहचता येतं – विमानाने मदुराई, कोईम्बतूर अथवा त्रिची यापैकी कोणत्याही एअरपोर्टला उतरून त्यानंतर गाडीने जावं लागतं. अथवा कोडाईकनालला ट्रेनने पालानी स्टेशनला उतरून जावं लागतं.
आकर्षण – बेरीजाम लेक, कोडाई लेक, पलानी हिल्स
- कुर्ग (Coorg)-कर्नाटकमधील कुर्ग हे निसर्गासाठी आणि तिथल्या जंगलांसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे पावसाळ्यात हे ठिकाण अतिशय सुंदर दिसतं. येथील धबधबे आणि तलावदेखील अप्रतिम दिसतात. त्याशिवाय याठिकाणचं एक वैशिष्ट्य म्हणजे इथलं खाणं. इथे विशिष्ट चवीचं मिळणारं खाणं हे भारतात दुसरीकडे कुठेही तुम्हाला चाखायला मिळत नाही. तर पावसाळ्यात इथे अतिशय सुखद वातावरण असतं. निसर्गाच्या कुशीत असलेल्या कुर्गमध्ये तुम्ही पावसाळ्यात गेल्यास, तुम्हाला परत यावंसं वाटणारही नाही.
कोणासाठी – निसर्गप्रेमी
काय करता येतं – बोटिंग, बर्डवॉचिंग, एलिफंट इंटरअॅक्शन, हॉर्स रायडिंग, कॉफी प्लांटेशन टूर
कसं पोहचता येतं – विमानाने बंगलोरला जाऊन पुढे रोड ट्रीप करता येते. मैसूर, मंगलोर, हसन या तिनही रेल्वे स्टेशनवरूनही तुम्हाला कुर्गला जाता येतं. इथे उतरून पुढे तुम्हाला गाडीने कुर्गला पोहचावं लागतं.
आकर्षण – पुष्पगिरी वाईल्डलाईफ सेंक्चुरी, जोग फॉल्स (धबधबा) जो भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक आहे.
- लेह लडाख (Leh Ladakh)-आपल्याकडे भारतात पाऊस पडत असताना ऑगस्ट – सप्टेंबर महिन्यामध्ये लेह – लडाखला फेस्टिव्हल असतो. लेह लडाखला जाण्यासाठी हे दोन महिने उत्कृष्ट असतात. या ठिकाणी जायचं बऱ्याच जणांचं स्वप्नं असतं. अतिशय नितळ पाणी, स्वच्छ आणि सुंदर डोंगर, बर्फाच्छादित प्रदेश आणि खडकाळ प्रदेश असूनही अप्रतिम निसर्गाचा देखावा हे इथलं वैशिष्ट्य आहे. ही जागा म्हणजे एक जादू असल्याचंही म्हटलं जातं.
कोणासाठी – निसर्गप्रेमी, साहसप्रेमी,
काय करता येतं – साईटसीन, वाईल्डलाईफ, बाईक राईड्स
कसं पोहचता येतं – दिल्लीवरून रोड ट्रीप करायची असल्यास, बारा तास. विमानाने श्रीनगरला उतरून पुढे रोड ट्रीप. अथवा लेह एअरपोर्टवरून पुढे.
आकर्षण – लडाख फेस्टिव्हल टूर, पॅनगाँग लेक, तिबेटीयन लेक, चांगला पास बर्फाच्छादित प्रदेश, ठीकसे मोनेस्ट्री
- उदयपूर (Udaypur)-उदयपूर हे महाल आणि तलावांनी भरलेलं शहर आहे. राजस्थानमध्ये असूनही पावळ्यात हे शहर खूपच सुंदर दिसतं. इथले तलाव आणि बाजूची हिरवळ तुमच्या डोळ्यांना सुख मिळवून देते. उदयपूर हे खूपच सुंदर शहर असल्यामुळे पावसाळ्यात याचं सौंदर्य अधिक खुलून येतं असं म्हटलं जातं. ठिकठिकाणी असणाऱ्या रॉयल गोष्टींंमुळे तुम्ही याकडे अधिक आकर्षित होता.
कोणासाठी – हेरिटेज लव्हर्स, हनिमूनर्स
काय करता येतं – साईटसीन, बोटिंग
कसं पोहचता येतं – उदयपूर रेल्वे स्टेशन आहे. त्यामुळे तुम्ही ट्रेनने जाऊ शकता. उदयपूरपासून साधारण 22 किमीवर असणाऱ्या महाराणा प्रताप एअरपोर्टवर तुम्ही उतरून पुढे जाऊ शकता.
आकर्षण – लडाख फेस्टिव्हल टूर, पॅनगाँग लेक, तिबेटीयन लेक, चांगला पास बर्फाच्छादित प्रदेश, ठीकसे मोनेस्ट्री
- स्पीति व्हॅली (Spiti Valley)-हिमाचल प्रदेशात असणारं हे छोटंसं तिबेट अद्यापही माणसांच्या नजरेपासून दूर असल्यामुळे इथलं सौंदर्य जपलं गेलं आहे. पावसाळ्यात फिरण्यासाठी हे ऑफबीट ठिकाण खूपच सुंदर आहे. इथला निसर्ग पाहून डोळे अक्षरशः भरून पावतात असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. इथली हवा प्रदूषणविरहीत असून तुमच्या आरोग्यासाठी नक्कीच लाभदायक आहे.
कोणासाठी – निसर्गप्रेमी, साहसीप्रेमी, संस्कृती अभ्यासक
काय करता येतं – कँपिंग, वाईल्डलाईफ व्ह्यूईंग आणि साईटसीन
कसं पोहचता येतं – सिमला हे जवळचं रेल्वे स्टेशन असून कुल्लू हे जवळील एअरपोर्ट आहे. या दोन्ही ठिकाणाहून तुम्हाला या ठिकाणी पोहचता येतं.
आकर्षण – पिनव्हॅली नॅशनल पार्क, ल्हालुंग मोनेस्ट्री
- राणीखेत (Ranikhet – Uttarakhand)-डोंगरदऱ्यांनी घेरलेलं उत्तराखंडमधील राणीखेत हे ठिकाण पावसाळ्यात फिरायला जाण्यासाठी अतिशय सुंदर आहे. हिरवळीने भरलेले डोंगर, चांगलं हवामान, हिमालय पर्वताच्या रांगा, जंगल आणि सुंदर वातावरणाने नटलेलं राणीखेत पावसाळ्यात अजून सुंदर दिसतं. मुंबई – दिल्लीसारख्या शहरात प्रखर उन्हाचा त्रास होत असेल तर राणीखेतला जाणं नक्कीच चांगला पर्याय ठरू शकतो.
कोणासाठी – निसर्गप्रेमी, हनीमूनर्स
काय करता येतं – ट्रेकिंग, मंदिर भेट, जंगल टूर
कसं पोहचता येतं – नवी दिल्लीवरून राणीखेतसाठी डायरेक्ट ट्रेन आहे.
आकर्षण – फुलांच्या बागा, एशियाटिक ब्लॅक बेअर, चिता आणि अनेक पक्षी