अमेरिकन पॉपस्टार रिहानानं शेतकरी आंदोलनासंदर्भात ट्विट केल्यानंतर परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने एक टि्वट करत यावर आपली भूमिका मांडली होती. परराष्ट्र मंत्रालयाच्या उत्तरानंतर देशातील कला व क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी देशाच्या अखंडतेबाबत ट्विट केले होते. यात भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांनीही ट्विट केलं होतं. या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरे यांनी मोदी सरकारला फटकारलं आहे.
माध्यमांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले, “सरकारनं या गोष्टी करायला नको. ही सगळी खूप मोठी लोकं आहेत. या लोकांना अशा प्रकारचं ट्विट करायला सांगणं. एकाच हॅशटॅगवर सगळ्या लोकांची ट्विट येणं. त्यांना सरकारने अशा गोष्टींमध्ये पडायला लावू नये. हा सरकारच्या धोरणाचा विषय आहे. हा काही देशाचा विषय नाही. काही चीनमधून संकट आलंय. पाकिस्तानमधून आलंय. शेतकऱ्यांचं संकट आहेच मोठं. त्या अक्षय कुमारवरती आटपायचा ना विषय. लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर ही भारतरत्नं आहेत. त्यांना अशा गोष्टी करायला सांगणं… ती साधी माणसं आहेत. सरकारनं त्यांना सांगितलं, त्यांनी ट्विट केलं. पण आज जे ट्रोल होतंय ते त्यांच्यावरच येतंय,” असं म्हणत राज ठाकरे यांनी सरकारला फटकारलं.
“भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड मान्य नाही. बाह्यशक्ती बघ्याच्या भूमिकेत राहू शकतात, पण हस्तक्षेप करु शकत नाहीत. भारतीयांना देशाबद्दल माहित आहे आणि देशवासीयांनी निर्णय घ्यायला हवा. देश म्हणून आपण सर्व एकत्र राहूया” असं ट्विट तेंडुलकरने म्हटलं होतं.