मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी मिशन ब्रेक द चेन, अनिल देशमुख राजीनामा यासह विविध विषयांवर भाष्य केलं. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता त्यांना प्रमोट करावं, निर्बंधांच्या काळातील वीज बिल माफ करा, शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा, अशा अनेक सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला केल्या आहेत. राज ठाकरे यांनी सोमवारी (5 एप्रिल) मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधत केलेल्या सूचनांची माहिती आज दिली.
दरम्यान मुख्यमंत्र्यांनी या सूचनांबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. सूचना योग्य असून मंत्रिमंडळाशी चर्चा करुन उपाययोजना करु, असं त्यांनी म्हटलं, असं राज ठाकरे यांनी सांगितलं. छोट्या व्यापाऱ्यांना उत्पादन करण्यास सांगितलं मात्र विक्री करण्यास मनाई केली. अशा व्यापाऱ्यांसाठी आठवड्यांतून दोन किंवा तीन वेळा दुकानं खुली ठेवण्यास परवानगी दिली.
व्यायसायिकांना वीज बिल माफी द्यावी, लोकांना दिलासा देणं गरजेचं आहे. निर्बंधांच्या काळातील वीज बिल सरकारने माफ करावं. अनेक कंत्राटी कामगार सरकारने घेतलं होतं. या कामगारांना परत बोलवा, त्यांना महापालिकेत कायमस्वरुपी घ्यावं. कंत्राटी कामगारांच्या विषयाकडे लक्ष द्यावं, असं राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. तसेच मनोरंजन क्षेत्र, सलून यांनाही आठवड्यातून दोन-तीन वेळा दुकानं सुरु करण्यास परवानगी द्यावी. क्रीडा सराव करणाऱ्या सर्व खेळांडूना परवानगी मिळणं आवश्यक आहे. गर्दी होणार नाही, परंतु सराव करायला मंजुरी मिळावी, अशी विनंती राज ठाकरे यांनी केली आहे.
राज्य सरकारने शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा. एकदा शेतकरी कोसळला तर पुन्हा संकट आपल्यावर येईल. शाळा बंद आहे, तरी फी आकारणं सुरुच आहे. विद्यार्थ्यांचं वर्ष वाया गेलं आहे. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता त्यांना प्रमोट केलं पाहिजे. विद्यार्थ्यांप्रमाणे शाळांचाही विचार सरकारने करावा, अशी माहिती राज ठाकरे यांनी यावेळी दिली.