कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी शिवसेनेत प्रवेश करून २४ तास उलटण्याआधीच ज्येष्ठ नगरसेवक मंदार हळबे यांनी भाजपामध्ये प्रवेश करत मनसेला खिंडार पाडलं. यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महत्वाचा निर्णय घेतला असून लोकसभा मतदारसंघाप्रमाणे समिती स्थापन करा असे आदेश राज ठाकरेंनी दिले आहेत. एक नेता आणि एक सरचिटणीस अशी ही समिती असणार आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने राज ठाकरे यांची नुकतीच पक्षातील महत्वाच्या नेत्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत मुंबईतील लोकसभा मतदारसंघाप्रमाणे समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे अमित ठाकरे यांच्यावरही मोठी जबाबदारी देण्यात आली असून मुंबईतील उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघ त्यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. अमित ठाकरे यांच्यासोबत संदीप देशपांडे यांच्यावर उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आहे.
“अमित ठाकरे उत्तम प्रकारचं काम करु शकतील असा आम्हाला विश्वास आहे. अमित ठाकरे संयमाने सर्व काम करु शकतात. म्हणूनच राज ठाकरेंनी इतर नेत्यांप्रमाणे त्यांच्यावरही जबाबदारी दिली आहे,” अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.
“प्रत्येक शाखेत जे वास्तव आहे ते राज ठाकरेंसमोर आणायचं आहे. जी परिस्थिती आहे ती मांडायची आहे. मुंबईपासून सुरुवात केली असून नंतर ठाणे, पुणे, नाशिक येथे जाऊ,” असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान डोंबिवलीतील घडामोडींवर बैठकीत चर्चा झाली की नाही विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “त्यावर काही चर्चा झाली नाही. तो विषय संपला आहे, आता पुढे काय करायचं यावर चर्चा झाली”.
मनसेची समिती
१) उत्तर मुंबई
बाळा नांदगावकर – नेते, मनसे
संजय नाईक – सरचिटणीस, मनसे
२) उत्तर मध्य
संजय चित्रे – नेते, मनसे
राजा चौगुले – सरचिटणीस, मनसे
३) उत्तर पश्चिम
शिरीष सावंत – नेते, मनसे
आदित्य शिरोडकर – सरचिटणीस, मनसे
४) दक्षिण मध्य
अविनाश अभ्यंकर – नेते, मनसे
नयन कदम – सरचिटणीस, मनसे
५) दक्षिण मुंबई
नितीन सरदेसाई – नेते, मनसे
मनोज चव्हाण – सरचिटणीस, मनसे
६) उत्तर पूर्व
अमित ठाकरे – नेते, मनसे
संदीप देशपांडे – सरचिटणीस, मनसे
“पक्षवाढीसाठी, नागरी समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करूनही पक्षाच्या नेतृत्वाने त्याची दखल घेतली नाही, अशा शब्दांत मंदार हळबे यांनी पक्षांतराची कारणमीमांसा केली आहे. ‘समाज, संघटन कौशल्य आणि सामाजिक बांधिलकीचे टप्पे ओळखण्यात स्थानिक मनसेचं नेतृत्व कमी पडलं. स्थानिक पातळीवर मनसेत जे चाललंय त्याचा सविस्तर अहवाल पक्षप्रमुख राज ठाकरे यांना पाठविला होता. त्यानंतर काही हालचाल झाली नाही,’ असेही ते म्हणाले. राजेश कदम यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देताच २४ तासांच्या आत राज ठाकरे यांनी मनोज घरत यांची आता डोंबिवलीच्या शहराध्यक्षपदी निवड केली आहे.