फुगेवाडी विषारी दारू प्रकरणातील २२ कुटुंबांना प्रत्येकी ₹५ लाखांची मदत मंजूर
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
महाराष्ट्र विधिमंडळाच्या २०२६ च्या पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांनी पिंपरी-चिंचवडसह राज्यातील जनहिताचे तब्बल १४ महत्त्वाचे प्रश्न प्रभावीपणे सभागृहात मांडत शासनाचे लक्ष वेधले. शहराच्या विकासापासून कामगार, महिला, मागासवर्गीय, पर्यावरण, पाणी, सुरक्षा आणि सामाजिक न्याय अशा विविध विषयांवर त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.
अधिवेशनातील त्यांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळत दापोडी-फुगेवाडी विषारी दारू प्रकरणातील मृत २२ नागरिकांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपये, अशी एकूण १.१० कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली. तसेच मुख्य आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई, तपास सीआयडीकडे वर्ग करणे आणि मिथेनॉल पुरवठा साखळीविरोधात विशेष मोहीम राबविण्याची घोषणा शासनाने केली.
दरम्यान, अधिवेशनातील कामगिरीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषद मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत्यूंचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार गोरखे यांनी रद्द केली. राजकीय श्रेयवादापेक्षा पीडितांच्या दुःखात सहभागी होत त्यांनी सामाजिक संवेदनशीलतेला प्राधान्य दिल्याचे सांगितले.
अधिवेशनातील प्रमुख मुद्दे
• फुगेवाडी विषारी दारू प्रकरणात पीडितांना न्याय
• एमआयडीसी कामगारांच्या घरांच्या पुनर्विकासाचा प्रश्न
• गेमिंग झोन सुरक्षेसाठी कठोर नियमांची मागणी
• पुणे-पिंपरी-चिंचवड पाणी सुरक्षेचा प्रश्न
• मागासवर्गीयांवरील अत्याचारांबाबत कठोर कारवाईची मागणी
• अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा मुद्दा
• महिला शेतकरी सक्षमीकरणासाठी ठोस सूचना
• मुठा नदी प्रदूषण व RMC प्रकल्पांवर कारवाई
• अटल सेतूवरील वाहतूक व प्रवासी सुविधांचा प्रश्न
• अपघातग्रस्तांना मदतीसाठी जनजागृतीची मागणी
• विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनपटाच्या नावावरील आक्षेप
• मराठीतून अभियांत्रिकी शिक्षणाला प्रोत्साहन
• पुणे महापालिकेच्या वृक्षगणना कंत्राटाची चौकशी
• बेकायदेशीर वृक्षतोड व वनसंरक्षणाचा मुद्दा
आमदार अमित गोरखे म्हणाले, “फुगेवाडी विषारी दारू प्रकरणातील पीडितांना न्याय मिळवून देणे ही माझी जबाबदारी होती. दोषींनाकठोर शिक्षा आणि पीडित कुटुंबांना आधार मिळेपर्यंत माझा लढा सुरूच राहील. तसेच मोशी कचरा डेपो दुर्घटनेचे गांभीर्य लक्षातघेऊन यंदा अधिवेशनानंतरची पत्रकार परिषद न घेण्याचा निर्णय मी संवेदनशीलतेतून घेतला आहे.”
पिंपरी-चिंचवड आणि राज्यातील जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत, अधिवेशनात प्रभावी उपस्थिती नोंदविणाऱ्या आमदार अमित गोरखे यांच्या कामगिरीची राजकीय व सामाजिक स्तरावर चर्चा सुरू झाली आहे.


