राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे आता अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) रडारवर आले आहेत. प्राप्त माहितीनुसार नवाब मलिकांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात नेण्यात आलं आहे.
जुन्या मालमत्ता व्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांची अंमलबजावणी संचालनालय (ईडी)कडून चौकशी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. प्राप्त माहितीनुसार पहाटेच ईडीच पथक नवाब मलिक यांच्या घरी धडकलं होतं. त्यानंतर सकाळी सात वाजेपासून नवाब मलिक यांची ईडी कार्यालयात अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे.
”देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून केंद्रीय तपास यंत्रणा राज्यात कारवाई करतात. ईडीचे लोक कसे भेटतात, कशी चौकशी करतात हे आम्हाला माहिती आहे. वेळ आल्यावर आम्ही माहिती बाहेर काढू” असा इशारा नवाब मलिक यांनी या अगोदर दिला होता. तर, आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा भाऊ इक्बाल कासकर याला विशेष न्यायालयाने शुक्रवारी २४ फेब्रुवारीपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) कोठडी सुनावलेली आहे. त्यानंतर आता ईडीच्या रडारवर नवाब मलिक आले आहेत.
दरम्यान पहाटे पाच वाजताच ईडीचे अधिकारी नवाब मलिक यांच्या घऱी पोहोचले होते. यानंतर त्यांनी ईडी कार्यालयात नेण्यात आलं असून चौकशी सुरु आहे. एका जमिनीच्या व्यवहारासंबंधी नवाब मलिकांची चौकशी केली जात असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली असून नवाब मलिक यांच्यावर राग काढण्याचे काम कदाचित चालू झालेलं दिसत आहे अशी टीका केली आहे. ते म्हणाले की, “हा सत्तेचा दुरुपयोग करण्याचा आणखी प्रकार आहे, कोणतीही, सूचना ने देता पहाटे सहा वाजता येऊन ईडी स्वतःच पोलीस आणत राज्यातील मंत्र्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता घेऊन जाणं ही नियमांची पायमल्ली आहे”.


