१४ ऑक्टोबर २०२०,
करोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेला लॉकडाउन राज्य सरकार टप्प्याटप्प्याने शिथील करत आहे. १ ऑक्टोबरपासून लॉकडानच्या पाचव्या टप्प्याला सुरुवात झाली असून ठाकरे सरकारकडून काही निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. दरम्यान राज्य सरकारने मेट्रो आणि ग्रंथालयं सुरु करण्यासाठीही परवानगी दिली आहे. यासंदर्भात राज्य सरकारकडून नवं परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे. यामध्ये शाळा, महाविद्यालयं सुरु करण्यासाठी अद्यापही परवानगी देण्यात आलेली नाही, मात्र शिक्षकांना ५० टक्के उपस्थितीची मुभा देण्यात आली आहे.
परिपत्रकात देण्यात आलेल्या माहितीनुसार, शाळा, महाविद्यालयं तसंच शैक्षणिक आणि प्रशिक्षण संस्था ३१ ऑक्टोबरपर्यंत बंद राहणार आहेत. दरम्यान शाळांना ५० टक्के शिक्षक तसंच इतर कर्मचाऱ्यांना ऑनलाइन शिक्षण, टेली काऊन्सलिंग याशिवाय इतर कामांसाठी शाळेत बोलावण्याची परवानगी देण्यात आली आहे. शाळा शिक्षण विभागाकडून यासंबंधी नियमावली जाहीर केली जाणार आहे.
सर्व सरकारी आणि खासगी ग्रंथालयांना करोनासंबंधित नियमांचं पालन करुन काम सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. १५ ऑक्टोबरपासून ग्रंथालयं सुरु होणार आहेत. याशिवाय मेट्रोलाही टप्याटप्याने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय आठवडी बाजार भरवण्यासही परवानगी देण्यात आली आहे. १५ ऑक्टोबरपासून कंटेनमेंट झोनच्या बाहेर आठवडी बाजार भरवला जाऊ शकतो असं राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे.