३० जुलै २०२१,
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात धुमाकूळ घातल्यानंतर पुन्हा एकदा धुवाँधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, पुणे, ठाण्यासह मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पुढील तीन तासांत जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार रायगड, ठाणे, मुंबई, नंदूरबार, धुळे, जळगाव, पुणे, अहमदनगर, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद आणि जालन्यात पुढील तीन तासांत मुसळधार पाऊस होणार आहे. त्यामुळे हवामान खात्याने या जिल्ह्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
या जिल्ह्यांना अधिक इशारा
येत्या तीन तासात ठाणे, रायगड, पुणे आणि साताऱ्यात मध्यम आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुणे, रायगड, ठाणे आणि साताऱ्यात ताशी 30 ते 40 किमी वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. तर मुंबईत आज अंशतः ढगाळ हवामान राहणार असल्याचंही हवामान खात्याने स्पष्ट केलं आहे. मात्र, मुंबईसह बदलापूर, अंबरनाथ परिसरात हलक्या स्वरुपाच्या सरी पडत असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
सोमवारपर्यंत पावसाचा अंदाज..
हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेकडून 2 ऑगस्टपर्यंतचा हवामानाचा अंदाज जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामानाच्या अधिक माहितीसाठी आयएमडीच्या मुंबई आणि नागपूर वेधशाळेच्या वेबसाईटला भेट देण्याचं आवाहन के.एस. होसाळीकर यांनी केलं आहे.


