महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी व महायुती यांच्यात थेट झालेल्या लढाईत कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. २० नोव्हेंबर रोजी मतदान झाल्यानंतर समोर आलेल्या मतदानोत्तर चाचण्यांद्वारे जाहीर झालेले अंदाज पाहून महायुती व मविआमध्ये अटीतटीची लढत होईल असं दिसत होतं. काही एक्झिट पोल्समधून राज्यात त्रिशंकू स्थिती निर्माण होईल, अशी शक्यता वर्तवली होती. तीन चाचण्यांनी अंदाज वर्तवला होता की राज्यात मविआला बहुमत मिळेल. मात्र, सर्व राजकीय विश्लेषक, मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज चुकीचे ठरवत महायुतीने तब्बल २३४ जागांवर विजय मिळवला आहे. रात्री १२ वाजता हाती आलेल्या अंतिम निकालांनुसार २८८ पैकी २३४ जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. तर, महाविकास आघाडीने केवळ ५० जागा जिंकल्या आहेत. महायुतीमध्ये भाजपाला १३२, शिवसेनेला (शिंदे) ५७, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला (अजित पवार) ४१ जागा मिळाल्या आहेत. तर, महाविकास आघाडीत शिवसेनेला (ठाकरे) २०, काँग्रेसला १६ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने १० जागा जिंकल्या आहेत.
भाजपाला बहुमताची जादूई संख्या गाठण्यासाठी पक्षाला केवळ १३ आमदारच कमी पडत आहेत. शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) या पक्षांनीही जोरदार मुसंडी मारत अनुक्रमे उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षांना जोरदार हादरा दिला. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे साफ पानिपत झाले असून प्रथमच राज्याची विधानसभा विरोधी पक्षनेत्याविना कामकाज करेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
निवडणुकीच्या तोंडावर आणलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’; प्रचार रंगात आला असताना भाजपाने चर्चेत आणलेले ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक है तो सेफ है’ हे मुद्दे; नेत्यांमधील समन्वय आणि बूथ स्तरावर केलेले अत्यंत काटेकोर नियोजन याचा महायुतीला मोठा फायदा झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पडद्याआडून केलेली मदतही सत्ताधारी युतीच्या पथ्यावर पडल्याचं मानलं जात आहे. दुसरीकडे घटक पक्षांमधील एकवाक्यतेचा अभाव आणि जागावाटपापासूनच अनेक मुद्द्यांवर मुख्य नेत्यांमध्ये असलेले वाद महाविकास आघाडीला भोवल्याचं निकालाअंती दिसत आहे. परिणामी विधानसभेचेविरोधी पक्षनेतेपद मिळविण्यासाठी आवश्यक असलेल्या २९ जागादेखील (एकूण सदस्यांच्या १० टक्के) आघाडीतील एकही पक्ष मिळवू शकला नाही.
पक्षनिहाय आकडेवारी


