Tuesday, December 9, 2025
Homeताजी बातमीमराठी ज्ञानभाषा व्हावी, मराठी बोलीभाषा टिकली तर मराठी टिकेल

मराठी ज्ञानभाषा व्हावी, मराठी बोलीभाषा टिकली तर मराठी टिकेल

जागतिक मराठी अकादमी आणि रयत शिक्षण संस्था सातारा या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने सातारा येथे छत्रपती शिवाजी कॉलेजच्या प्रांगणात सुरु असलेल्या शोध मराठी मनाचा या जागतिक संमेलनात आज दुसरे सत्रात ‘ अभिजात मराठी आणि माध्यमे’ या विषयावर संवाद सत्र झाले. या संवाद सत्रात रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकात दळवी, बंगलोर येथील जगन्नाथ पाटील, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे विनोद कुलकर्णी, नाशिकच्या मराठी विद्या प्रसारक संस्थेचे नितीन ठाकरे ,मराठीतील बाल वाडमय लेखिका लीला शिंदे इत्यादी वक्ते म्हणून सहभागी झाले. संवादक म्हणून पत्रकार अरुण खोरे व महेश म्हात्रे यांनी संवादक म्हणून या विषयावर चर्चा घडवून आणली.

या सत्रात प्रारंभी चंद्रकांत दळवी यांना विचारणा केली असता त्यांनी भाषा संचालनायाच्या अधिकारी यांना मराठीसाठी पुरेशे बजेट नसल्याने उत्साह नसल्याचे सांगून मराठी भाषेसाठी विशेष प्रोत्साहन द्यावे लागेल असे म्हणाले. रयत शिक्षण संस्थेमध्ये आम्हाला जाणवत आहे की मराठी माध्यमाच्या काही माध्यमिक शाळा आहेत किंवा प्राथमिक शाळांच्यामध्ये सुद्धा इंग्लिश मीडियमला मुलांना घालण्याची जी काही एक लाट आली आहे त्या लाटेमध्ये मराठी प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळांना विद्यार्थ्यांची पटसंख्या घटत चाललेली आहे पटसंख्या घटना मागचं मुख्य कारण असं दिसतं की इंग्लिश मीडियमच्या शाळा निघाल्यामुळे पटसंख्या घटते आहे असे ते म्हणाले.

लीला शिंदे म्हणाल्या की मी मराठीतून जवळपास ४० मुलांच्यासाठी पुस्तके लिहिली आहेत. सर्वसाधारण समाजात दारिद्र्य आणि गरिबी असल्याने विद्यार्थ्यांना दर्जेदार पुस्तके मिळत नाहीत. मराठी भाषिकात अनेक गट तट आहेत, आमच्या मराठवाड्याकडे जे लेखन करतात त्यांच्या भाषेत परिसराचा प्रभाव असणारच आहे. शहरी भागात लहान मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. शिक्षण अधिकारी यांनी मुलांना उत्तम बाल वाड्मय वाचण्यास मिळवून दिले पाहिजे.

नितीन ठाकरे म्हणाले की ‘प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हे मराठी भाषेतच व्हावे. इंग्रजी शाळा वाढवण्याचे काम सरकारच करीत आहे. सरकारचे शिक्षणाकडे लक्ष कमी आहे. विना अनुदानितकडे शासनाचे लक्ष आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असला तरी परकीय भाषेमध्ये शिक्षण घेण्यापेक्षा ते आपल्या मातृभाषेमध्येच देणे गरजेचे आहे त्याकरता जे आपले शिक्षण तज्ञ आहेत त्यांनी सुद्धा मी आता म्हटलं त्या पद्धतीने आपला उच्च माध्यमिक असेल किंवा त्याच्या पुढच्या जे काही प्रोफेशनल कॉलेज आपण म्हणतो तिथे सुद्धा त्या मराठी भाषेचा वापर झाला पाहिजे. इंजीनियरिंग कॉलेजचा सिल्याबस सुद्धा मराठी मध्ये असावा अशा प्रकारचा मतप्रवाह आता सुरू झालेला आहे.

आमचे शालेय शिक्षण मंत्री यांच्या नाशिकची आहे दादाजी भुसे यांनी परवा ही घोषणा केली की ज्या केंद्रीय शाळा आहेत त्या शाळेमध्ये सुद्धा मराठी हा विषय आम्ही आता अनिवार्य करणार आहोत. मी त्या निमित्ताने त्यांचे मनापासून अभिनंदन करतो की एक चांगला निर्णय आपण घेतला. कारण आतापर्यंत केंद्रीय शाळांमध्ये अशा प्रकारचा निर्णय कधी झालेला नव्हता आणि त्यामुळे मराठी हा विषय कुठल्याही माध्यमाची शाळा असो त्या शाळेमध्ये मराठी विषय घेतलाच पाहिजे, कंपल्सरी केलं पाहिजे. आपल्याकडे कुठली गोष्ट अनिवार्य केल्याशिवाय ती आपण स्वीकारत नाही आणि म्हणून या निमित्ताने किंवा मंत्रिमंडळाचे या निमित्ताने अभिनंदन करतो आणि मराठी भाषेला खरंच चांगले दिवस आहेत. आपण सगळे मिळून प्रयत्न केला तर नक्कीच ही भाषा पुढे जाईल.

जगन्नाथ पाटील म्हणाले की, या विषयाच्या दृष्टिकोनातून आणि एकूण ऍक्टिव्हिटीच्या दृष्टीने परिघाबाहेरचा माणूस आहे. गेली 22 वर्ष मी महाराष्ट्राच्या बाहेर आहे आणि आजही महाराष्ट्र बाहेर आहे. परंतु माझं मराठी पण अजून सोडलेलं नाहीये. त्यामुळे मला या संमेलनाला अनेक वर्ष बोलावता येत आणि बाहेर काय चाललंय आणि बाहेरच्या मराठी माणसांच्या मनामध्ये महाराष्ट्रात काय चाललंय याच्याबद्दलची जी रुख रुख आहे चिंता आहे. मी जपानमध्ये होतो. जपान सरकारने मला शैक्षणिक सल्लागार म्हणून बोलावलं होतं एक वर्षभर आणि त्यामुळे तिथल्या वेगवेगळे विद्यापीठ आणि इतर शिक्षण व्यवस्था याच्याशी अतिशय जवळून पाहण्याचा किंबहुना त्यांना सल्ला देण्याचा असा अनुभव माझ्या गाठीशी आहे. तेथे सर्व शिक्षण जपानी भाषेतच दिले जाते हे महत्वाचा आहे.

लीला शिंदे म्हणाल्या मी ज्या कॉलेजमध्ये शिकत होते ते सगळे तिथे बंजारा होते. दांड्यावरून आले होते. त्यांना मराठी कुठली येणार म्हणजे आम्हाला अशा पद्धतीची सर्कसच करावे लागले की आधीच साधी भाषा बोला मग त्यांच्या काही शब्द आणि मग हळूहळू अभिजात माझ्याकडे आम्ही वळलो तेव्हा कुठे आम्ही समाजशास्त्र काही प्रमाणात शिकवू शकलो. पण त्यांची भाषा पण आम्हाला काही शब्द हसता नाही पण काही शब्द इतके समृद्ध असतात की आमच्या मराठवाड्यामध्ये आम्ही अगदी तालुका पातळीवर खेड्यापर्यंत बालकुमार संमेलन भरवतो.

विनोद कुलकर्णी म्हणाले की, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा सहजा सहजी मिळालेला नाही. २०१३ नंतर १० वर्षे संघर्ष केला. राजकीय इच्छाशक्ती प्रबळ असेल तर प्रश्न सुटत सुटतात. सातारा जिल्ह्याने एक लाख पत्रे पाठविली. महाबळेश्वर देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवले. दिल्लीत जाऊन आंदोलन केले. शरद पवार ते इतर राजकीय नेते यांना जागरूक केले. मद्रास उच्च न्यायालय स्थगिती आली होती. त्रिशंकू कौल जनतेने दिला – त्यामुळे सारा बदल झाला. भाषेची मते मिळण्यासाठी अभिजात भाषेचा दर्जा दिला – संजय राउत बोलले कुठेही अध्यादेश जाहीर नाही.. नंतर दिल्लीला जाऊन अभिजात मराठी भाषेचा दर्जा असल्याचे पत्र उदय सामंत यांनी आणले.

लीला शिंदे म्हणाले की, मराठी भाषा ज्ञान भाषा व्हायला हवी. बोली भाषा टिकली तर मराठी भाषा टिकेल, मराठी भाषा यातूनच समृद्ध होईल.बोली भाषा एकजीव व्हायला हवी.नितीन ठाकरे यांना धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक या परिसरात आदिवासी बोली असल्याचे सांगून या बाबतीत नाशिक परिसरात तुम्ही काय काम करीत असल्याबद्दल विचारले. आदिवासीचे वाड्मय स्वतंत्र असावे, त्याचा फायदा आदिवासी व मराठी भाषिकांना होईल. असे सांगितले. आदिवासी विद्यापीठे आदिवासी परिसरातील जिल्ह्यात करण्याचे विषयी त्यांनी माहिती दिली.

उपजीविका देणाऱ्या भाषेला प्राध्यान्य हा न्याय असल्यामुळे मराठीचे कसे होणार या विषयी विचारणा केली तेंव्हा जगन्नाथ पाटील म्हणाले आता अभियांत्रिकी शिक्षण देखील त्या त्या भाषेत घ्यावे. शिक्षकांनी मराठी भाषेचे अभ्यासक्रम तयार करून घ्यायला हवे. स्वायत्तता त्यांना नको वाटते, प्रत्येक शिक्षकाचे आता मुल्यांकन करण्याची गरज आहे.त्याच्या गुणवत्तेप्रमाणे त्यांना पगार द्यावा .

चंद्रकात दळवी म्हणाले की आपल्या देशात अनेकविध भाषा असल्यामुळे प्रत्येक प्रादेशिक भाषेला जास्त महत्व मिळेल असे नाही पण सगळ्याच भाषेचे जतन व संवर्धन करण्याचे धोरण योग्यच आहे. मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धा करण्यासाठी आपल्या सर्वच भाषा त्या योग्यतेच्या लगेच करणे यातील मर्यादा समजून घ्यावी.११ कोटी मराठी भाषिक लोक आहेत. मराठीमध्ये आपण सोफ्टवेअर करण्याची गरज आहे. म्हात्रे म्हणाले की दिल्लीचे तख्त मराठी चालवीत होते, तेंव्हा राजभाषा, व्यवहार भाषा पुढे नेली. ज्यांची भाषा पुढे जाते तेच लोक राज्यकर्ते बनतात. भाषा, भूषा, भोजन, भवन या चार गोष्टी महत्वाच्या आहेत. असे सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments