मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणावरुन पोलीस अधिकारी सचिन वाझेंबद्दल ठाकरे सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला. वाझे यांची बदली होणार असल्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत केली आहे. कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर निवेदन देण्यासाठी अनिल देशमुख विधानपरिषदेत उपस्थित होते. यावेळी त्यांनी सचिन वाझे यांची क्राइम ब्रांचमधून बदली करुन इतर ठिकाणी नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती दिली. विरोधक मात्र अटकेच्या मागणीवर ठाम असून यावेळी सभागृहात गोंधळ घालण्यात आल्याचे दिसून आले.
अनिल देशमुख यांनी यावेळी सांगितलं की, “सचिन वाझेंवर नियमानुसार कारवाई होईल. सध्या क्राइम ब्रांच जिथे ते कामाला आहेत तिथून हलवून दुसऱ्या ठिकाणी नियुक्ती करण्यात येईल”. निष्पक्षपणे चौकशी करुन जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असंही यावेळी त्यांनी सांगितलं.
अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंची बदली होणार असल्याची घोषणा केल्यानंतरही विरोधकांचा गदारोळ कायम होता. बदली नाही तर निलंबन करुन अटक करा, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान “मनसुख हिरेन प्रकरणात ज्या गोष्टी उपलब्ध आहेत त्या नष्ट करण्यासाठी सरकार संधी देत आहे. राज्यातील जनतेचा सरकावर विश्वास राहिलेला नाही. कोण लागून गेला सचिन वाझे? तुमचा जावई आहे का सभापती महोदय? का हे सरकार पाठीशी घालत आहे?” असे संतप्त सवाल प्रवीण दरेकर यांनी विचारले.