Saturday, March 22, 2025
Homeताजी बातमीकेंद्र सरकारच्या पाकिस्तानला मोफत लस देण्यावरून काँग्रेस आक्रमक, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले...

केंद्र सरकारच्या पाकिस्तानला मोफत लस देण्यावरून काँग्रेस आक्रमक, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले…

नाना पटोले यांनी महाराष्ट्राला लस पुरवठा करण्यावर केंद्र सरकारवर टीका केली आहे. “राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून, शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. करोना रुग्णांमध्ये २० ते ४५ वर्षांतील तरुणांची संख्या लक्षणीय असल्याचे दिसून आले आहे. नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने हे तरुण बाहेर पडतात त्यामुळे कोरोनाची लागण तरुणांना जास्त होत आहे. हा धोका लक्षात घेऊन १८ वर्षांवरील सर्वांना सरसकट करोनाची लस द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.”

“राज्यात कोरोनाचं संकट वाढत आहे. दुसरीकडे लसीकरणाची मोहिमही राबिवली जात आहे. १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील लोकांना लस देण्यास सुरुवात केली, ही चांगली बाब असली तरी सध्यस्थितीत तरुणांमध्ये कोरोनाची लागण झपाट्यानं होत असल्याचं समोर आल्यानं वयाची अट शिथिल करणे ही काळाची गरज आहे. यासाठी राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्यासाठी परवानगी मिळवावी व राज्यभर मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी पटोले यांनी केली आहे.

कोरोनाचा बदललेला विषाणू घातक असून, संक्रमणाचा वेगही अधिक आहे. फेब्रुवारीपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली, तेव्हापासून २० ते ४५ वयोगटातील तरुणांना याचा संसर्ग झाल्याचं पाहायला मिळत आहे. नोकरी, कामानिमित्त घराबाहेर पडणारे हे तरुण घरी येऊन घरातील वयोवृद्ध, लहान मुलांमध्ये त्याचा संसर्ग होण्याची मोठी भीती आहे. त्यामुळे आता लसीकरणासाठी १८ वर्षांवरील तरुणांना लस देणं गरजेचं आहे. या वर्गातील सर्वांना लस दिली, तर कोरोना संक्रमणाची साखळी तोडणं सोपं होईल. देशात मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध असतानाही केवळ वयाच्या अटीमुळे तरुणांना लस घेता येत नाही हे दुर्दैवी आहे. ज्या झपाट्यानं कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे, त्याच्यापेक्षा जास्त वेगानं लसीकरण केलं गेलं पाहिजे,” अशी भूमिका नाना पटोले यांनी मांडली आहे.

“महाराष्ट्राला कोरोना लसीची नितांत गरज असताना केंद्र सरकार मात्र अत्यल्प लस पुरवठा करत आहे आणि पाकिस्तानसह इतर देशांना मोफत लस देण्याचं काम केंद्र सरकार करत आहे. महाराष्ट्रात कोरोनाची रुग्णसंख्या देशात जास्त असून, परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी पुरेशा प्रमाणात लस पुरवठा करा, अशी मागणी करत जनतेनंही करोना प्रतिबंधक नियमांचं काटेकोर पालन करावं. मास्क वापरणं, साबणानं हात स्वच्छ धुणं व सोशल डिस्टंसिंगचं पालन या त्रिसुत्रीचा अवलंब करावा,” असं आवाहनही पटोले यांनी केलं.

“देशात महामारी काही पहिल्यांदा आलेली नाही. काँग्रेसचं सरकार असताना महामारींचा सामना करावा लागला होता. त्यासाठी तत्कालीन काँग्रेस सरकारनं योग्य नियोजन करुन त्यावर यशस्वी मात केली. पोलिओ लसीकरणाची मोहीम मोठ्या प्रमाणात राबविली. बस स्टॅण्ड, रेल्वे स्टेशन, सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवल्यानं त्यावर मात करण्यात यश आलं. पोलिओवर जर मात करता येऊ शकली तर कोरोनावर मात करणेही शक्य आहे. गरज आहे ती केंद्र सरकारनं दृढ निश्चय करुन सार्वत्रिकरित्या मोठ्या प्रमाणात तसेच सरसकट कोरोना लसीकरणाची मोहीम राबवण्याची. केंद्र सरकारनं राज्य सरकारला मोठ्या प्रमाणात लसींचा पुरवठा केल्यास कोरोनाच्या महामारीवरही नक्कीच मात करता येईल,” असा विश्वासही पटोले यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments