राज्याचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये विविध क्षेत्रासंदर्भातील घोषणा करण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने त्यांनी कोकणाच्या विकासासाठी मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाला पर्यायी महामार्ग बांधणार असल्याची घोषणा केली. या रस्ता ५४० किलोमीटर लांबीचा असेल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.
अनेक वर्षापासून चर्चेत असणारा रेवस (जि. रायगड) ते रेडी (जि. सिंधुदुर्ग) या महामार्गासाठी ९ हजार ५७३ कोटींची घोषणा महाविकास आघाडी सरकारने केली आहे. हा महामार्ग एकूण ५४० किमीचा असणार आहे. बॅरिस्टर अंतुले वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री झाले तेव्हा त्यांनी या सागरी महामार्गाच्या कामासाठी पुढाकार घेतला. पण नंतरच्या काळात यात काही प्रगती झाली नाही.
मूळ राष्ट्रीय सागरी महामार्गाचा महाराष्ट्रातील भाग हा रेवस (जि. रायगड) ते रेडी (जि. सिंधुदुर्ग) एवढा आहे. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये या महामार्गाचा सुधारित आराखडा नव्याने सादर करण्यात आला. तसेच या महामार्गाच्या कामाला गती मिळावी म्हणून हे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे म्हणजेच एमएमसआरडीसीकडे हस्तांतरित करण्याच्या प्रकल्पासाठी मंजुरी तातडीने देण्यात यावी अशी सूचना सार्वनिजिक बांधकाम मंत्र्यांनी केली. या महामार्गावरील सहा पुलांचे काम पूर्ण झाले आहे. मात्र त्या पुलांना जोडरस्ते उपलब्ध नसल्याने त्यांचा वाहतुकीसाठी उपयोग करता येत नाहीय. हा महामार्ग निवडणुकीमध्येही प्रचारादरम्यान गाजलेल्या मुद्द्यांपैकी एक होता.